संजय जाधव , पैठणसात वर्षांपासून रखडलेल्या विहिरी ३० दिवसांच्या आत खोदून व बांधकाम करून पूर्ण करा असे अजब आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने काढल्याने लाभार्थी हतबल झाले़ त्यामुळे दिलेल्या मुदतीत हे काम पूर्ण करणे शक्य न झाल्याने लाभार्थ्यांचे अनुदान परत गेले आहे़ पैठण तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना शासनाच्या या अजब निर्णयाचा फटका बसला असून, विहीर पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे. जवाहर विहीर योजनेअंतर्गत सन २००८ मध्ये मंजूर केलेल्या विहिरीसाठी राज्य शासनाने वाढीव १ लाख ५० हजार रुपये अनुदान मंजूर केले होते; मात्र आता विहीर ३० दिवसांच्या आत पूर्ण करावी अन्यथा अनुदान मिळणार नाही, असे अजब आदेश जि़प़ प्रशासनाने भरपावसळ्यात काढले आहेत;मात्र मिळालेला अवधी व विहिरीचे काम करणारे मजूर न भेटल्याने या विहिरी शेतकरी पूर्ण करू शकले नाहीत़ परिणामी पैठण तालुक्यात फक्त ३ शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळाला असून उर्वरित शेतकऱ्यांना या अजब निर्णयाचा फटका बसला आहेजवाहर विहीर योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून एक लक्ष रुपयाचे अनुदान देण्यात येत होते़ दरम्यान, हे अनुदान प्रत्यक्ष विहीर खोदण्यासाठी खूपच कमी पडत असल्याने व विहिरीचे उद्दिष्ट पूर्ण होत नसल्याने २३ जानेवारी २०१४ ला शासनाने या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देय असलेले अनुदान एक लाखाऐवजी २ लाख ५० हजार असे वाढवून दिले़ याबाबत २७ मे २०१५ रोजी जि़ प़ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पैठण पंचायत समितीला पत्र पाठवून विहिरी ३० जून २०१५ पर्यंत पूर्ण कराव्यात. जे लाभार्थी या मुदतीत विहीर पूर्ण करतील त्यांनाच हे अनुदान द्यावे असे आदेश काढले़ यानंतर पंचायत समिती प्रशासनाने लाभार्थ्यांना शोधून याबाबत अवगत केले. या योजनेअंतर्गत पैठण तालुक्यात सन २००८ मध्ये साखरबाई थोरात (आगरनांदर), शिवाजी जगन्नाथ काळे (नांदर), प्रभाकर नवले (सोनवाडी), तारामती गोजरे (आनंदपूर), श्रीधर औटे (आपेगाव), संतोष शंकरराव राऊत (नांदर), अनिता दादासाहेब म्हस्के (आखतवाडा), विठ्ठल गिरगे (आखतवाडा), शरद म्हस्के (आखतवाडा), दत्तात्रय म्हस्के (वडवाळी), गोरख हिंगले (लिंबगाव), कल्याण वाकडे (साळवडगाव) या शेतकऱ्यांना जवाहर विहीर मंजूर झाल्या होत्या; मात्र यापैकी केवळ ३ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ झाला आहे़ शेतकऱ्यांनी विहीर खोदण्यासाठी मुदतवाढ मिळावी म्हणून अर्ज केले आहेत़ याबाबत मुदतवाढीसाठी प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात येतील असे गटविकास अधिकारी उल्हास सोमवंशी यांनी सांगितले़ दरम्यान, शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी मुदतवाढ द्यावी आणि त्यांचे अनुदान रद्द करू नये, तसेच अधिकाऱ्यांनी १५ दिवसांच्या आत विहीर खोदून दाखवावी असे आव्हानही तालुकाध्यक्ष रवींद्र काळे यांनी दिले आहे़ १५ दिवसांत विहीर कोण खोदणार?पंचायत समितीकडून विहीर खोदण्याबाबतचा निरोप ७ जूनला मिळाला़ आमच्याकडे विहीर खोदून तिचे बांधकाम करण्यासाठी फक्त २३ दिवसांचा अवधी होता़ त्यात ७ जूनपासून १२ जूनपर्यंत सारखा पाऊस पडत होता़ त्यामुळे विहीर खोदण्यासाठी मजूर मिळाले नाहीत़ १५ दिवसांत कशी विहीर पूर्ण करणार, अशी हताश प्रतिक्रिया लाभार्थी संतोष राऊत यांनी व्यक्त केली आहे़ या विहिरी खोदण्यासाठी मुदत वाढवून द्यावी अशी मागणी अनेक शेतकऱ्यांनी केली आहे़
३० दिवसांत विहिरी खोदा
By admin | Updated: July 7, 2015 00:44 IST