सोयगाव : शेंदूर्णी येथे विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या स्कूल बसचा अपघात झाल्यामुळे पालकांमध्ये भीतीमय वातावरण निर्माण झाले आहे. कालबाह्य वाहनांमधून मुलांना पाठवायचे की नाही, असा प्रश्न पालकांना पडला आहे. गावातच दर्जेदार शिक्षण मिळावे किंवा शाळांनीच चांगल्यावाहनांची व्यवस्था करावी, अशी मागणी पालकांतून होत आहे.सोयगाव शहरातील एक हजार मुले-मुली शेंदूर्णी (ता. जामनेर, जि. जळगाव) येथे शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी दररोज ये-जा करतात. खासगी शाळांमधील दर्जेदार शिक्षणाच्या आशेपायी पालक मुलांना सात कि.मी. लांब शिकण्यासाठी पाठवितात. ३ वेगवेगळ््या संस्थेच्या शाळा, महाविद्यालयात विद्यार्थी शिक्षण घेतात. पूर्वी केवळ एस.टी. पास काढून विद्यार्थी जात असत; परंतु विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे खासगी स्कूल बसमध्ये विद्यार्थी ये-जा करू लागले. सर्व शाळा मिळून किमान १५ वाहनांमधून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. यासाठी संस्थांनी खासगी वाहनांना विद्यार्थी वाहतुकीची परवानगी दिलेली आहे. त्यामुळे वाहनचालकांनी कालबाह्य झालेल्या जुन्या गाड्या घेऊन हा व्यवसाय सुरू केलेला आहे. अगोदरच जुन्या असलेल्या वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसविले जातात. त्यामुळे अपघाताची शक्यता जास्त असते.मागणी झालेल्या वाहनांची अवस्था पाहून टायर जाम झाल्यामुळे अपघात झाल्याचे दिसत आहे. अपघातामध्ये ड्रायव्हर शेजारी बसलेले मुले पूर्णपणे दबलेली होती. त्यांना बाहेर काढण्यासाठी करवत, कटर, पहार यासारखे साहित्य वापरावे लागले. शेवटी जेसीबीने ओढून एक मुलगा बाहेर काढावा लागला. स्कूल बसला सोयगावमध्ये पहिल्यांदाच अपघात झाला. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे पालकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झालेली आहे. मुलांच्या शिक्षणाविषयी पालक चिंता व्यक्त करीत आहेत.
स्कूल बसच्या अपघातामुळे वाढली भीती
By admin | Updated: December 11, 2014 00:46 IST