बीड : यावर्षी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पिके पिकली नाहीत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य घेऊन येणाऱ्यांची संख्या निम्म्याने घटली. येथे अपेक्षेप्रमाणे धान्याला भावही मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृउबात धान्य आणण्यास पाठ फिरवली. याचा परिणाम कृउबाच्यसा उत्पन्नावरही जाणवला.े मागील चार वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. उसनवारीच्या पैशावर शेतकऱ्यांनी बि-बियाणे खरेदी करून पेरण्या केल्या. मात्र, शेतकऱ्यांना अपक्षेप्रमाणे उत्पन्न मिळाले नाही. खरीपासह रबी पिकांनीही दगा दिल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. ज्वारी, बाजरी, गहू, सोयाबीन, कापूस या पिकांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या हाती निम्मेच उत्पादन पडले. त्यामुळे शेतकरी खचून गेला. सध्या बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्वारीला १५५० ते २२०० रूपये भाव आहे. बाजरीला १३०० ते १६०० तर गव्हाला १८०० ते २५०० रूपये भाव दिला जात असल्याचे सचिव आर. पी. बहीर यांनी सांगितले. भाव पडले, आवकही घटली गतवर्षी बीड कृउबाअंतर्गत साडेपाच लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. ४५०० ते ४६०० रूपये प्रतिक्विंटल भाव कापसाला मिळाला. यावर्षी नोव्हेंबर ते मार्च दरम्यान कापूस खरेदी झाली. यावर्षी मात्र, केवळ साडेतीन लाख क्विंटल कापसाची खरेदी होऊन चार हजार ते ४१०० रूपये प्रती क्विंटल कापसाला भाव मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. तूर सात हजाराने घटली गतवर्षी तुरीची आवक १२ हजार क्विंटल एवढी होती. ४३०० रूपये भाव तुरीला मिळाली. यावर्षी मात्र तुरीच्या भावात २०० रूपये वाढ होऊन भाव ४५०० रूपये झाला. आवक मात्र पाच हजार क्विंटलच झाली, असे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कृउबामध्ये धान्याची आवक निम्म्यावर
By admin | Updated: June 9, 2015 00:16 IST