अंबाजोगाई : शहरात वाहतुकीच्या कोंडीने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. शाळेच्या समोर व रस्त्यावरच वाहने उभी केल्याने लहान चिमुकल्यांनी रस्त्यावरून ये-जा कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येकडे पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचे चित्र असून, वाहनचालकांच्या बेशिस्तपणाचा फटका चिमुकल्यांना सहन करावा लागतो. शहरातील प्रशांत नगर परिसरात योगेश्वरी प्राथमिक शाळा आहे. या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीचे तीन हजार विद्यार्थी आहेत. तसेच याच रस्त्यावर अंगणवाडया, लहान मोठी विद्यालये यांचीही मोठी संख्या आहे. कोचिंग क्लासेस, रुग्णालय, बँका व व्यापारपेठ म्हणून मुख्य रस्त्यावर मोठी वर्दळ असते. लहान मुले व पालकांचा दिवसभर राबता या रस्त्यांवरून असतो. मात्र, या रस्त्यावर रिक्षे, चार चाकी वाहने, दुचाकी वाहने, पार्किंग केली जातात. याचा मोठा त्रास मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांना होतो. हा रस्ता शालेय विद्यार्थ्यांसाठी मोकळा करून द्यावा व या रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी स्वतंत्र वाहतूक पोलिस नेमण्यात यावा. अशी मागणी योगेश्वरी शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली गोस्वामी यांनी केली आहे. योगेश्वरी महाविद्यालय, गोदावरीबाई कुंकुलोळ कन्या विद्यालय, योगेश्वरी हायस्कूल मधील पाच हजार विद्यार्थी या रस्त्यावरून ये-जा करतात. त्यांनाही त्रास होतो. (वार्ताहर)
वाहनचालकांचा बेशिस्तपणा वाढला
By admin | Updated: August 23, 2015 00:01 IST