व्यंकटेश वैष्णव , बीडतीन वर्षांपासून पडलेल्या दुष्काळाने आमचे जगण्याचे गणित बिघडले आहे. जनावरांना चारा नाही. पिण्याचे पाणी ४० किलो मीटरवरून आणावे लागते. खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी हातउसणे घेतलेले पैसे परत द्यायचे कसे? असा प्रश्न आहे. नापिकीमुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. ‘एवढी भयावह परिस्थिती असतानाही जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर होत नाही, यामुळे आमचा दुष्काळी दौऱ्यांवर येणाऱ्या पथकांवरचा विश्वासच उडालायं’ अशा तीव्र शब्दात शेतकऱ्यांनी आपली मते व्यक्त केली. दुष्काळ जाहीर करण्यासाठी अजून माणसं मरायची वाट पहाताय काय? असा सवालही यावेळी चौसाळ्याच्या शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकाची गाडी अडवून विचारल्याने पथकातील अधिकाऱ्यांची गोची झाली.दुष्काळाने होरपळलेल्या खरीप पिकांची पहाणी करण्यासाठी मंगळवारी केंद्रीय पथक बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. पथकात केंद्रीय दुष्काळ निवारण आयुक्त राघवेंद्र सिंघ, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जि. प. सीईओ नामदेव ननावरे, कृषी अधीक्षक रमेश भताने, डॉ. विकास सुर्यवंशी यांच्यासह गेवराई तहसीलदार चंद्रकांत सूर्यवंशी यांची पथकात उपस्थिती होती. चौसाळा परिसरातील पाच ते सहा गावच्या शेतकऱ्यांची उपस्थिती होती. यामध्ये सयाजी शिंदे, निलेश गुंजाळ, बाबूराव नाईकवाडे, यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.
पोकळ आश्वासने नको, दुष्काळ जाहीर करा
By admin | Updated: August 12, 2015 01:00 IST