लातूर : खाजगी टँकरद्वारे पाणी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर कोणाचेच नियंत्रण नसल्यामुळे मनमानी भाव आकारून नागरिकांची लूट होत आहे. ‘लोकमत’ने या संदर्भात प्रकाश टाकल्यानंतर आता प्रशासन सरसावले आहे. मनपा आयुक्तांनी पाणी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांची बैठक बुधवारी बोलाविली असून, या बैठकीत त्यांचे म्हणणे जाणून घेतल्यानंतर दर आकारणी ठरविली जाणार आहे.लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई असल्याने अनेकांनी पाणी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. छोट्या व मोठ्या टँकरद्वारे घरपोच पाणी देण्याचा हा व्यवसाय तेजीत आला आहे. ५०० लिटर्सपासून १२ हजार लिटर्स क्षमतेच्या टँकरद्वारे पाणी पुरवठ्याचा व्यवसाय शहरात जोरात चालू असून, विक्रेते मनमानी आकारणी करून नागरिकांना वेठीस धरीत आहेत. ‘लोकमत’ने या संदर्भात पाणी विक्रेत्यांवर नियंत्रण कोणाचे? या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केल्यानंतर मनपा आयुक्तांनी विक्रेत्यांची बैठक बोलाविली आहे. बुधवारी मनपा आयुक्तांच्या दालनात ही बैठक होणार असून, सर्व विक्रेत्यांचे म्हणणे जाणून घेतल्यानंतर दराबाबत चर्चा केली जाणार आहे. वाहतुकीचा खर्च, वीजबिल व अंतर लक्षात घेऊन दर ठरविण्याबाबत या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. दरम्यान, विक्रेत्यांचा एक संघ स्थापन करण्याचाही विचार असून, या संघाला दराबाबत सक्त निर्देश देण्याच्या हालचाली प्रशासनाकडून आहेत.शहरात मनपाकडून व ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या टंचाई निवारण कक्षाकडून टँकर सुरू आहेत. या टँकरसाठी जो खर्च शासन करते, त्या धर्तीवर खाजगी वितरक व व्यावसायिकांना पाण्याचे वितरण करणे शक्य आहे का, या सर्व बाबींचा विचार बैठकीत केला जाणार आहे. त्यादृष्टीने पाणी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांची यादी मनपाच्या अधिकाऱ्यांनी तयार केली असून, त्यांना बैठकीला उपस्थित राहण्याबाबत निर्देशही देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
खाजगी टँकरच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाच्या हालचाली
By admin | Updated: February 9, 2016 00:27 IST