पालम : तालुक्यात गारपीटग्रस्त शेतकर्यांनी अनुदान वाटप सुरू आहे़ या यादीमधून अनेक शेतकर्यांची नावे वगळण्यात आले आहेत़ या वंचित शेतकर्यांना अजूनही मदत मिळालेली नाही़ यामुळे शेतकरी वर्गात प्रशासनाबद्दल नाराजीचा सूर उमटत आहे़ पालम तालुक्यात २८ फेब्रुवारी ते १२ मार्च या कालावधीत विविध भागात जोरदार गारपीट झाली होती़ गारपिटीमुळे शेतामधील उभी पिके जमीनदोस्त झाली़ गहू, ज्वारी, करडई व फळबागा या पिकांना सर्वाधिक फटका बसला होता़ शासकीय यंत्रणेने नुकसानीचे पंचनामे केले़ पण अजूनही काही गावातील याद्या करण्याचे काम सुरूच आहे़ तलाठ्यांकडून दलालांमार्फत शेतकर्यांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत़ अनुदानाच्या याद्या बँकेकडे पाठविण्यात आल्या आहेत़ परंतु, याद्या पाठविलेल्या गावातील अनेक शेतकर्यांची अनुदानाच्या यादीत नावेच नसल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे़ निसर्गाने संकटात पकडलेल्या शेतकर्यांसमोर प्रशासनानेही अडचणी निर्माण केल्या आहेत़ शेतकर्यांच्या नावे जमिनी असूनही शेतकर्यांच्या शेतात गारपीट कशी झाली नाही असा सवाल वंचित राहिलेल्या शेतकर्यांमधून होत आहे़ (प्रतिनिधी)
वंचित शेतकर्यांना अजूनही मदत मिळेना
By admin | Updated: May 19, 2014 00:16 IST