लातूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात असलेल्या डायलिसीस मशीनचा वापर होत नसल्याने ती भंगारात पडली आहे. सर्वसामान्य रुग्णांचे आधारवड असलेल्या सर्वोपचार रुग्णालयातील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. येथील डायलिसीस मशीन भंगारात पडल्याने खाजगी रुग्णालयांत रुग्णांना जावे लागत आहे.राज्य शासनाने २००८ साली अत्याधुनिक पद्धतीची डायलिसीस मशीन लातूरच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयास खरेदी करून दिली. परंतु, येथील डॉक्टरांच्या अनास्थेमुळे याचा वापर फारसा झालाच नाही. जवळपास १५ ते १६ लाख रुपये किंमतीची असलेली ही मशीन वापरण्याची तसदी रुग्णालय प्रशासनाने घेतली नसल्याने तब्बल आठ वर्षांपासून ही मशीन धूळ खात पडली आहे. रुग्णालय प्रशासन सांगते, शासनाने डायलिसीस मशीन दिली असली, तरी त्याला तंत्रज्ञच दिला नाही. त्यामुळे त्याचा वापर करावयाचा कसा, सरकारी अनास्थेने रुग्णांचे मात्र हाल वाढले आहेत. परिणामी, खाजगी रुग्णालयांकडे डायलिसीससाठी ओढा वाढलेला आहे. तंत्रज्ञाची पदमान्यता मिळविण्यासाठी तत्कालीन अधिष्ठातांनी अनेक दिवस राज्य शासनाच्या वैद्यकीय संचालकांकडे पाठपुरावा केला. तसेच आपण लाखो रुपये खर्च करून दिलेली मशीन वापराअभावी पडली असल्याची जाणीव करून दिल्यावरही संचालकांनी पदमान्यता दिलीच नाही. परिणामी, गेल्या आठ वर्षांपासून सर्वोपचार रुग्णालयाच्या स्टोअर रुममध्ये हे यंत्र धूळ खात पडले आहे. आठ वर्षांपासून वापर नसल्याने आता शासनाचे १६ लाख रुपये धुळीला मिळाले आहेत. सर्वोपचार रुग्णालयातील काही डॉक्टरांनी हे यंत्र चालविण्याचा प्रयत्न केला. परंतु, एखादा रुग्ण डायलिसीससाठी घेतल्यावर मध्येच काही बिघाड झाल्यास पर्यायी यंत्र उपलब्ध असायला हवे. तरच डॉक्टर रिस्क घेतात. इच्छा असतानाही त्याचा वापर करता आला नसल्याचे शल्य एका डॉक्टराने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सध्या १६ लाखांची मशीन भंगारात पडली असून, याला दोष कोणाचा, हे शोधण्याची वेळ आली आहे.
डायलिसीस मशीन भंगारात
By admin | Updated: February 14, 2016 00:03 IST