औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या (घाटी) मनोविकृतीशास्त्र विभागातील एकमेव सहयोगी प्राध्यापक डॉ. रश्मीन आंचलिया यांनी नोकरीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे हा विभाग पुन्हा एकदा कोमात गेला आहे.मराठवाड्यात शासकीय मनोरुग्णालय नाही. त्यामुळे मनोविकारासंबंधी सर्व रुग्ण थेट घाटी रुग्णालयातील मनोविकृतीशास्त्र विभागात दाखल होतात. मनोविकृती असलेल्या रुग्णांना अपंग प्रमाणपत्रही याच विभागाकडून वाटप करण्यात येते. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने या विभागाला दुय्यम दर्जाची वागणूक दिली आहे. विभागातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकाची पदे अनेक वर्षांपासून नामधारी भरण्यात आलेली आहेत. कारण २०११ साली मुंबईहून बदलून प्राध्यापक डॉ. हरदास हे येथे रुजू झालेले अन् दुसऱ्या दिवशी रजा न टाकता निघून गेले. ते आजतागायत येथे परत आले नाहीत. त्याचप्रमाणे दहा वर्षांपूर्वी एक सहयोगी प्राध्यापक येथे रुजू झाले आणि अन् गायब झाले. प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापकाचे पद तांत्रिकदृष्ट्या भरण्यात आलेले आहे. तेथील सहायक प्राध्यापकदी डॉ. रश्मीन आंचलिया हे कंत्राटी तत्त्वावर कार्यरत होते. डॉ. आंचलिया हे विभागप्रमुख म्हणूनही काम पाहत असत. आता त्यांनी राजीनामा दिला आहे. राजीनाम्याची नोटीस दिल्याने ते केवळ महिनाभर घाटीत कार्यरत राहणार आहेत. त्यांच्या राजीनाम्याने मनोविकृतीशास्त्र विभाग कोमात गेला आहे. रुग्णांना याचा प्रत्यक्ष फटका बसणार आहे. वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. अविनाश मगरे म्हणाले की, डॉ. आंचलिया यांनी राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आम्ही तेथे एका तज्ज्ञ डॉक्टरची नियुक्ती केली आहे.रुग्णसेवेवर परिणाम होणार नाही.४या विभागाचा वॉर्ड छत कोसळल्याने चार महिन्यांपासून बंद पडलेला आहे. वॉर्डच उपलब्ध नसल्याने मनोरुग्णांना अॅडमिट केले जात नाही. ४बाह्यरुग्ण विभागात नव्याने दाखल होणाऱ्या आणि पुनर्तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या १२५ च्या आसपास असते. डॉ. आंचलिया हे रुग्णांवर उपचार करीत. आता त्यांच्या राजीनाम्यानंतर तातडीने रिक्त पद न भरल्यास तेथील ओपीडीही बंद पडू शकते.
मनोविकृतीशास्त्र विभाग कोमात
By admin | Updated: December 2, 2014 01:09 IST