औरंगाबाद : जिल्ह्यातील धरणग्रस्त आणि धरणांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी गुरुवारी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यामध्ये टेंभापुरी, जायकवाडी, सिरेगाव धरणाचे प्रकल्पग्रस्त तसेच या धरणांच्या लाभक्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाध्यक्ष सुभेदार सुखदेव बन आणि अॅड. आसाराम लहाने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने १ सप्टेंबर २०१४ चा शासन निर्णय काढून सिंचन विकासासाठी धरणग्रस्तांचा बेकायदा पद्धतीने गळा घोटला आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा, तसेच टेंभापुरी, जायकवाडी, सिरेगाव व इतर धरणग्रस्तांना पर्यायी जमीन देऊन त्यांचे पुनर्वसन करावे आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. यात एकनाथ साबळे, साहेबराव साबळे, रामनाथ ढोले, बाबूराव ढोले, सय्यद पटेल, भानुदास गाडेकर, आबासाहेब गावंडे, अविनाश डांगे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले.
धरणग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
By admin | Updated: September 19, 2014 01:16 IST