लातूर : मिरजहून कृष्णेचे पाणी रेल्वेने लातूरला आणण्यात येत आहे़ रेल्वेने आलेले पाणी उतरवून घेण्यासाठी लागणारी यंत्रणा लातुरात सज्ज झाली असून सोमवारी दिवसभर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात कामकाज सुरू होते़ रेल्वे वॅगिनमध्ये आलेले पाणी उतरवून घेऊन ते टँकरमध्ये भरण्यासाठी विहिरीपासून काही अंतरावर ४ पॉर्इंट तयार करण्यात आले आहेत़ आता फक्त ‘पाणी एक्स्पे्रस’ची उत्सुकता लातूरकरांना लागली आहे़ मिरजहून सकाळीच रेल्वे निघाली असून क्रॉसिंगमुळे विलंब होत असल्याचे सांगण्यात आले़ रात्री उशिरा ही पाणी एक्स्प्रेस लातुरात पोहचेल, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले़ या रेल्वेत जवळपास ५ लाख लिटर्स पाणी येत आहे़मिरज रेल्वेस्थानकातून सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दहा वॅगिनमध्ये ५ लाख लिटर्स पाणी भरून पाणी एक्स्प्रेस लातूरकडे निघाली आहे़ रेल्वेतील पाणी उतरवून घेण्यासाठी लागणारी सर्व कामे पूर्ण करण्यासाठी २४ तास काम सुरू आहे़ जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी महानगरपालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदींच्या मदतीने पाणी उतरवून घेण्याचे काम पूर्ण केले आहे़ ट्रायलबेसेसवर जरी दहा वॅगिन पाणी येत असले तरी एकाच वेळी २५ लाख लिटर्स पाणी आले तरी ते उतरवून घेता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे़ रेल्वेस्थानकापासून जवळच असलेल्या एस़आऱदेशमुख यांच्या शेतातील विहिरीतील गाळ उपसा करण्यात आल्यानंतर सोमवारी प्लॅस्टिक ताडपत्री टाकण्यात आली आहे़ पाणी विहिरीत मुरणार नाही, यासाठी प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे़ रेल्वेतून पाणी उतरवून घेण्यासाठी लागणारी सर्व कामे पूर्ण झाली आहेत़ सिमेंटची पाईपलाईन टाकण्यात आली आहे़ शिवाय, विहिरीत टाकलेले पाणी जलकुंभापर्यंत पोहचविण्यासाठी एचडीजलवाहिनी टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे़ विहिरीतून टँकर भरण्यासाठी सोमवारी चार पॉर्इंट तयार झाले आहेत़ येथून मोठे टँकर भरले जातील़ हे पाणी हरंगुळ व आर्वी येथील जलशुध्दीकरण केंद्रात टाकण्यात येणार आहे़ याठिकाणी २४ तास वीज उपलब्ध राहील, अशी व्यवस्था करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले़ एस़आऱदेशमुख यांच्या शेतातील विहिरीत घेतलेले पाणी आर्वीच्या जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाईपलाईनद्वारे नेले जाणार आहे़ सध्या या जलवाहिनीचे काम सुरू झाले असले तरी ते लवकर पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे़ मात्र, दिवसरात्र काम सुरू असल्याने लवकरच हे कामही पूर्ण होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली़ प्रशासन सज्ज़़़विहिरीतील गाळ उपसा पूर्ण झाला, ताडपत्री टाकण्यात आली़ शिवाय, वरच्या बाजूचे प्लास्टरही करण्यात आले आहे़ रेल्वे कधीही आली तरी आपण आपल्याकडील सर्व कामे पूर्ण झाली आहेत़ प्रशासनाकडून सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे़ आता केवळ रेल्वेची प्रतीक्षा लागली आहे़ जलकुंभात पाणी टाकल्यास ४ तासात वॅगिन रिकामी होईल़ ट्रायल बेसवर पाणी येत असले तरी ते शुध्द पाणी आहे़ तरीही आपण त्याच्यावर प्रक्रिया करूनच टँकरने शहरात पूरविणार असल्याचे मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सांगितले़
क्रॉसिंगमुळे होतोय रेल्वेला विलंब
By admin | Updated: April 12, 2016 00:32 IST