बीड : सतत दुष्काळी परिस्थिती असल्याने अनेक उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. परिणामी ‘महावितरण’चे अति उच्च दाबाच्या ग्राहकांमध्ये दिवसेंदिवस घट होत आहे. अनेकांनी तात्पुरते कनेक्शन बंद केले आहे तर अनेकांनी कायमस्वरूपाचे.जिल्ह्यातील कापसाच्या जिनिंग केंद्रात ‘महावितरणा’लाही मोठा लाभ मिळतो. गतवर्षी अतिउच्च दाबाचे १८० ग्राहक होते. मात्र, अनेक उद्योग बंद पडल्याने यामध्ये ९ ग्राहकांची घट झाली आहे तर महावितरणाला चार कोटींचा फटका बसला आहे. दरवर्षी या ग्राहकांकडून हंगामात वीज कनेक्शन घेतले जाते व इतर वेळी हे कनेक्शन तात्पुरत्या स्वरूपावर बंद केले जाते. यामधूनही महावितरणाला कमी स्वरूपात का होईना फायदा होतो. मात्र, कायमस्वरूपी कनेक्शन बंद केल्याने वीजबिले देता येत नाहीत.अद्यापपर्यंत माजलगाव तालुक्यात २, बीड ग्रामीणमध्ये २ तर गेवराई तालुक्यात १ जिनिंगचे कायमस्वरूपी कनेक्शन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे महिन्याकाठीच्या वसुलीत फरक पडला असून, महावितरणची ग्राहक संख्या घटली आहे. अति उच्च दाबाच्या ग्राहकांना १०० केव्ही पेक्षा जास्त तर ५०० केव्ही पर्यंतची सेवा दिली जाते. त्यामधून महावितरणला मोठे उत्पन्न मिळते. सध्याची दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील व्यावसायिकदारांना याचा फटका बसला आहे. वर्षभरातून या ग्राहकांना किमान तीन महिने तरी हंगाम सुरू असल्याचे दाखविणे बंधनकारक आहे.मात्र, जिल्ह्यात महिनाभरही औद्योगिक ग्राहकांचे व्यवसाय सुरळीत चालू राहिले नाहीत. त्यामुळे अतिरिक्त बिलाचा ताण न घेता या ग्राहकांनी कायमस्वरूपी कनेक्शन बंद केले आहेत. याचा महावितरणाला मोठा फटका बसला. (प्रतिनिधी)
अतिउच्च दाबाच्या ग्राहकांमध्ये घट
By admin | Updated: November 4, 2015 00:24 IST