गणेश खेडकर , औरंगाबादअयोध्यानगरात घराला प्लास्टर करताना शुक्रवारी एका मजुराचा बळी गेला. घरांना लागून जाणाऱ्या महावितरणच्या विजेच्या तारा त्याला कारणीभूत ठरल्या. अयोध्यानगरसारख्या घटना यापूर्वी अनेदा घडल्या आहेत अन् घडतच आहेत. अशा घटनांसाठी नागरिक, त्यांची अतिक्रमणेच जबाबदार, अशी भूमिका घेत महावितरण मृत्यूचा सापळा ठरलेल्या या तारांकडे दुर्लक्ष करीत आले आहे. त्यामुळे ज्यांच्या घरावरून, समोरून विजेच्या तारा गेल्या आहेत, असे हजारो नागरिक दररोज मृत्यूच्या सावटाखाली जगत आहेत. चूक नागरिकांची असली तरी आता महावितरणने कायमस्वरुपी उपाययोजना करून ती दुरुस्त करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा अयोध्यानगरासारख्या घटना घडतच राहतील. लाईन आधीची की घरे, अतिक्रमण घरमालकांनी केले की ताराच घरापर्यंत गेल्या? या व इतर प्रश्नांमध्ये वेळ वाया न घालविता महावितरणने कमीत कमी हायटेंशन लाईनची अपघात स्थळे तरी कोटिंग वायरने सुरक्षित करावीत किंवा या लाईन भूमिगत टाकाव्यात, अशी मागणी करून महावितरण आणखी किती लोकांचे बळी घेणार, असा रोकडा सवाल शहरवासीयांनी केला आहे. एकट्या अयोध्यानगरमध्ये वर्षभरात तारांचा शॉक लागून तिघांचा मृत्यू झाला तर दोघांना अपंगत्व आले आहे. शुक्रवारी एका बांधकाम मजुराचा हायटेंशन तारेचा शॉक लागून मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महावितरणने आतापर्यंत सुरक्षेच्या दृष्टीने काही उपाययोजना केल्या आहेत का? याबाबत आढावा घेतला तर सक्षम अशी कुठलीही उपाययोजना केली नसल्याचे पुढे आले आहे. महावितरणने केवळ अंदाजपत्र तयार करून ते जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले आहे. शहरातील सिडको, हडकोचा संपूर्ण भाग, संपूर्ण जुने शहर, हर्सूल, चिकलठाणा, मुकुंदवाडी यासह पुंडलिकनगर, जयभवानीनगरसह बहुतांश ठिकाणे ही धोकादायक आहेत. संभाजी कॉलनी, एन-६ मध्ये अनेकांनी तारा गॅलरीत आल्यामुळे बांबूच्या साह्याने दूर लोटून दिल्या आहेत. काहींनी स्वखर्चाने पाईप टाकले आहेत. याच भागातील प्रभाकर नाईक यांच्या घराच्या जिन्याजवळ तारा आल्यामुळे त्यांनी सुरक्षेसाठी जाळी लावली. तसेच लाकडाच्या साह्याने तारा दूर लोटून दिल्या आहेत. याशिवाय रामलाल ताजी, इंदूबाई तांबट यांनीही घरापासून तारा दूर लोटून दिल्या आहेत. सतत भीतीच्या सावटाखाली राहावे लागते, असे इंदूबाई तांबट यांनी सांगितले. शहरात कमी दाबाची वीज वाहून नेणारे ४० हजार पोल आहेत. तब्बल २ हजार ३६० कि़मी.ची ही लाईन आहे. तर उच्च दाबाची (११ के.व्ही.) लाईन वाहून नेणारे ११ हजार ९०० पोल असून, ८५० कि़मी.ची ही लाईन आहे. याशिवाय ३३ के.व्ही.चे ३ हजार पोल असून, २०० कि़मी.ची ही लाईन आहे. यात तब्बल २१६० ठिकाणे धोकादायक असून, या वीज वाहिन्या इतरत्र स्थलांतरित करण्यासाठी अंदाजे ११ कोटी ७९ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. ४याबाबतचे अंदाजपत्रक जिल्हाधिकाऱ्यांना २ जुलै २०१५ रोजी सादर करण्यात आलेले आहे. भारतीय विद्युत नियम कायदा २००३ नुसार कमी दाबाच्या तारांपासून ३ मीटरपर्यंत घरे बांधू नयेत आणि उच्च दाबाच्या लाईनपासून ५ मीटर अंतरापर्यंत घरे बांधू नयेत, असे स्पष्ट बजावलेले आहे. ४शहरातील लोकांना तशा नोटिसाही देण्यात आलेल्या आहेत. मात्र, अनेकांनी अतिक्रमणे करून आपला जीव धोक्यात घातला आहे. तरी शहरातील धोकादायक लाईन इतरत्र स्थलांतरित करण्यासाठी जसा निधी उपलब्ध होईल तशी कामे सुरू करण्यात येणार आहेत, असे अधीक्षक अभियंता प्रभाकर निर्मळे यांनी सांगितले.
डोक्यावर मृत्यूच्या टांगत्या तारा
By admin | Updated: January 2, 2016 23:58 IST