हिंगोली : जिल्हाभरातील राष्ट्रीयीकृत, खाजगी व सहकारी बँकाकडून २०१६- १७ या वर्षात १ हजार ४६१ कोटी ३८ लाख ८९ हजारांचा पतपुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ हजार ३८ कोटी ८९ लाख ७६ हजाराचे पीककर्ज वाटप करण्याचे नियोजन आहे. त्याबाबतचा बँकांच्या वार्षिक पतपुरवठा कृती आराखड्याचे विमोचन जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा अग्रणी बँक अधिकारी महेश मदान, नाबार्डचे डीडीएम एस. एस. गोर्डे, अॅक्सीस बँकेचे कृषी व्ही. एम. करंदीकर, सुनील कुमार, एम. एल. पाटील, एन. पी. दीक्षित, ए. एन. गटाणी, व्ही. एम. कावरखे, सी. एस. डाके आदी बँकेचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाभरातील बँकांना सन २०१६- १७ च्या वार्षिक पतपुरवठा आराखड्याप्रमाणे नागरिकांना पतपुरवठा वेळेत उपलब्ध करुन द्यावा. तसेच शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीककर्जाचे वाटप नियमाप्रमाणे व वेळेत होईल, हे बँकानी काटेकोरपणे पहाण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कासार यांनी दिल्या. मदान यांनी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, सहकारी व खाजगी बँकांनी जिल्ह्यात यावर्षी करण्यात येणाऱ्या पतपुरवठ्याची माहिती दिली. यामध्ये वर्षिक पतपुरवठा आराखडा १४६१ कोटीचा असून यातील १ हजार ३८ कोटी खरीप (९६८ कोटी ५० लाख) व रब्बी (७० कोटी ३९ लाख १७) हंगामात शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपासाठी ठेवण्यात आल्याची माहिती दिली. तसेच कृषी पायाभूत सुविधा, शिक्षण, ऊर्जा, सामाजिक क्षेत्रातील पायाभूत सुविधा आदि साठी पतपुरवठा बँकाकडून करण्याचे नियोजन असल्याचे मदान यांनी सांगितले. यावेळी नाबार्डचे गोर्डे यांनी ही सर्व बँकांनी पीककर्ज वाटपामध्ये सुसूत्रता ठेऊन प्रत्येक शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ मिळवून देण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)
दीड हजार कोटींचा पतपुरवठा आराखडा
By admin | Updated: April 4, 2016 00:23 IST