जालना : भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) मार्फत सुरू असलेले जिल्ह्यातील सात कापूस खरेदी केंद्रे चार दिवसांमध्ये पुन्हा बंद पडली आहेत. जिल्ह्यातील खरेदी केंद्रांची संख्या कापूस साठविण्यासाठी कमी पडू लागल्याने शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दिवसेंदिवस मुक्काम ठोकावा लागत आहे. जिल्ह्यात ५ फेबु्रवारीपर्यंत सीसीआय केंद्रांवर ४ लाख ३१ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली. ३९५० रुपये दराने ही खरेदी होत आहे. सीसीआयने १५ नोव्हेंबर २०१५ पासून ही खरेदी केंद्रे सुरू केली. यामध्ये मुलचंद फुलचंद, गायत्री जिनिंग, किल्ला जीन, बन्सल जिनिंग, एनसीसी फायबर, वृषभ कॉटन आणि मराठवाडा जिनिंग या ठिकाणी ही खरेदी सुरू आहे. जिल्ह्यात या सातही केंद्रांवर अडीच महिन्यांच्या काळात कापूस खरेदीला शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. जिनिंग कारखान्यांवर कापूस ठेवायलाही जागा शिल्लक राहिली नाही. त्यामुळे २४ जानेवारी ते १ फेबु्रवारी या काळात खरेदी बंद ठेवावी लागली. २ तारखेपासून खरेदी सुरू झाली, परंतु चार दिवसात ५८ हजार क्विंटल खरेदी झाल्याने ६ तारखेपासून ही खरेदी तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्यात आली.जालना २२ हजार, भोकरदन व परतूर प्रत्येकी १ लाख ६० हजार क्विंटल, मंठा १ लाख तर अंबड येथे ८० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली. शेतकऱ्यांचा प्रतिसाद अजुनही सुरूच असून बाजार समिती कार्यालयात पावती फाडण्यासाठी आलेल्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. (प्रतिनिधी)काजळा ता. बदनापूर येथील शेतकरी सखाराम जाधव म्हणाले, शुक्रवारपासून आपण कापसाचा माल घेऊन बाजार समितीच्या आवारात आलो, मात्र अद्याप नंबर लागला नाही. एक-दोन दिवसात खरेदी सुरू होईल, असे सांगितल्याने मी वाहनासह येथेच थांबलो आहे. जालना बाजार समितीचे सचिव गणेशराव चौगुले म्हणाले, सीसीआयच्या कापूस खरेदीला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. कापसाची आवक वाढल्याने सातही जिनिंगवर सध्या कापूस ठेवायला जागा नाही. मात्र सोमवारी ही केंद्रे पूर्ववत सुरू होतील.
कापसाची आवक वाढली
By admin | Updated: February 9, 2015 00:43 IST