औरंगाबाद : आता उद्या सोमवारपासून शहरामध्ये संचारबंदी आणखी कडक करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी घेतला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्या २० व २१ एप्रिल असे दोन दिवस दुपारी १.३० ते रात्री ११ वाजेपर्यंत संचारबंदी कडकपणे राबविण्यात येणार आहे. वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा, शेतकरी, दुध उत्पादक, परवानगी देण्यात आलेले उद्योग व त्यांचे कामगार, राज्य तसेच केंद्र सरकारचे कर्तव्यावर असलेले अधिकारी व कर्मचारी वगळता उर्वरित सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश आहेत. तथापि, ८ एप्रिल पासूनच रात्री ७ ते ११ वाजेपर्यंत संचारबंदी कडक करण्यात आली होती. त्यानंतर १५ एप्रिलपासून १८ एप्रिलपर्यंत सायंकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत अतिशय प्रभावीपणे संचारबंदी राबविण्यात आली. आज रविवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शहरात संचारबंदी अधिक कडक करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतला असावा, असे बोलले जाते.
CoronaVirus: औरंगाबादमध्ये आज दुपारपासून संचारबंदी होणार आणखी कडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 00:37 IST