औरंगाबाद : केंद्र शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू केले. लसीकरणाला तरुणाईकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. दररोज १८ हजारांहून अधिक नागरिक लस घेत आहेत. रविवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाला शासनाकडून फक्त १२ हजार लसीचा साठा प्राप्त झाला. सोमवारी ८२ केंद्रांवर लस देण्यात येणार असून, दुपारपर्यंत हा साठा संपण्याची शक्यता आहे.
शहरात २२ जूनपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्यात येत आहे. सहा दिवसांपासून ७० केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. शनिवारी सकाळी महापालिकेकडे २० हजार लस शिल्लक होत्या. दिवसभरात १८ हजार १४८ नागरिकांना लस देण्यात आली. मनपाकडे केवळ दोन हजार लसींचाच साठा शिल्लक होता. रविवारी १२ हजार लसींचा पुरवठा झाला. त्यामुळे सोमवारी कोविशिल्ड लसींसाठी ७९ केंद्रांवर नियोजन केले आहे. या केंद्रांवर १८ वर्षांवरील सर्वांनाच पहिला व दुसरा डोस मिळेल, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. कोव्हॅक्सिनचा साठा कमी असल्याने महापालिकेने ही लस केवळ दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांसाठीच ठेवली आहे. तीन केंद्रांवरच ही लस नागरिकांना घेता येईल. सोमवारी मनपाला १४ हजार डोस नागरिकांना देता येतील. दुपारी तीन वाजेपर्यंत हे डोस संपण्याची शक्यता आहे. काही लसीकरण केंद्रांवर सकाळपासूनच लांबलचक रांगा लागत आहेत. मागील दोन ते तीन दिवसांपासून दुसरा डोस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहेत. दुसरा डोस घेणाऱ्यांना अगोदर प्राधान्य देण्यात येत आहे.