लातूर : ‘अक्षर मानव’चे संमेलन म्हणजे विधायक कार्य करणाऱ्या लोकांचे संमेलन आहे. या संमेलनातून माणसे जोडून संवाद साधण्याचे काम होते, असे मत आमदार अमित देशमुख यांनी येथे रविवारी व्यक्त केले.हासेगाव येथील सेवालयात गेल्या तीन दिवसांपासून अक्षर मानव साहित्य संमेलन सुरू आहे. या संमेलनाचा समारोप रविवारी झाला. यावेळी ते बोलत होते. मंचावर अक्षर मानव संघटनेचे अध्यक्ष राजन खान, अतुल देऊळगावकर, प्रा. राजा होळकुंदे, दिलीप आरळीकर, महापौर अख्तर शेख, सेवालयाचे प्रमुख रवि बापटले, उपमहापौर कैलास कांबळे, भारत भ्रमण करणारे बगिचासिंग, पत्रकार प्रवीण धोपटे, संजय अयाचित, लातूर जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष मोईज शेख, बाजार समितीचे उपाध्यक्ष मनोज पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दगडूसाहेब पडिले, सुनीता आरळीकर, अजय पांडे, ‘विकास’चे व्हाईस चेअरमन गोविंद बोराडे, चंद्रकांत देवकते, व्यंकटेश पुरी, समद पटेल, पप्पू देशमुख आदींची उपस्थिती होती. यावेळी साहित्यिक आणि लातूरकरांच्या प्रश्नांना आमदार अमित देशमुख यांनी दिलखुलास उत्तरे दिली. सेवालयातील मुलांसमवेत त्यांनी भोजनही घेतले. सेवालयातील समस्या जाणून घेतल्या. शिवाय, सेवालयाला विरोध करणाऱ्या लोकांना आपण समजावून सांगू. यापुढे कोणतीही अडचण आली, तर मी तुमच्यासोबत असेन, असा विश्वासही अमित देशमुख यांनी यावेळी दिला. सेवालय आंतरराष्ट्रीय दर्जाचे केंद्र व्हावे, यासाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी लातूरचा आमदार म्हणून मी माझे कर्तव्य समजतो, असेही आमदार अमित देशमुख यावेळी म्हणाले. (प्रतिनिधी)
‘अक्षर मानव’च्या संमेलनातून विधायक कार्य
By admin | Updated: February 15, 2016 00:13 IST