जालना: अकरा वर्षांपूर्वी बदनापूर तालुक्यातील निकळक येथील एका शेतकऱ्यास संपादीत केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला मिळत नसल्याने उपविभागीय अधिकारी जालना यांच्या कार्यालयातील साहित्याची जप्ती न्यायालयाच्या आदेशाने सोमवारी करण्यात येणार होती. मात्र एसडीएम यांनी २८ तारखेचा धनादेश दिल्याने ही जप्ती टळली. निकळक येथील अण्णा गवारे यांची गट क्रमांक १९३ व २३३ मधील दोन एकर चार गुंठे जमीन पाझर तलावासाठी २००५ मध्ये संपादीत करण्यात आली होती. अल्प मोबदला मिळाल्यामुळे गवारे यांनी भूसंपादन अधिनियम १६ अन्वये वाढीव मोबदल्यासाठी सदर प्रकरण न्या. रामकृष्ण बनकर यांच्या मार्फत २००५ मध्ये दाखल केले होते. २९ फेब्रुवारी २०१२ रोजी सदर प्रकरणाचा निकाल लागला. सदर दाव्याची अंमलबजावणी रक्कमे दावा २०१२ मध्ये प्रतिवादीच्या विरोधात दाखल केला होता. अद्यापपर्यंत प्रतिवादींनी सदर रक्कमेचा भरणा न्यायालयात केला नाही. वेळोवेळी समन्स व वॉरंट काढूनही रक्कमेचा भरणा न केल्यामुळे एक महिन्यापूर्वी विद्यामान दिवाणी न्यायाधीश राजश्री परदेशी यांनी प्रतिवादीच्या विरोधात जप्तीचे वॉरंट जारी केले होते. १० संगणक, २५ रॅक, ३०० खुर्च्या, टाईपरायटर दोन, टेबल ५०, झेरॉक्स मशीन एक, चार चाकी वाहन ५, कुलर पाच जप्त करण्यात येणार होते. मात्र २८ तारखेचा धनादेश मिळाल्याने जप्तीची कारवाई टळली. (प्रतिनिधी)
एसडीएम कार्यालयातील साहित्याची जप्ती टळली
By admin | Updated: April 25, 2016 23:25 IST