बीड : शहरातील खासबाग परिसरातील पूररेषेतील ३२ नागरिकांना नगर परिषदेच्या वतीने स्थलांतरीत होण्यासाठी नोटिसा दिल्या आहेत. पावसाळा सुरू झाला असल्याने नद्या नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी येऊ शकते. शहरातून खासबाग व डॉ. बाबसाहेब आंबेडकर पुतळा परिसर या भागातून बिंदूसरा नदी गेलेली आहे. नदीच्या पात्रालगत काही लोक वास्तव्यास आहेत. नदीला पूर आला तर त्यांची घरे वाहून जातील यात दुमत नाही. त्या अनुषंगाने नगर परिषदेच्या वतीने ३२ नागरिकांना स्थलांतरित होण्यासाठीच्या नोटिसा १५ दिवसांपूर्वी दिल्याची माहिती आरोग्य निरीक्षक विश्वंबर तिडके यांनी ‘लोकमत’ला दिली. दरम्यान, दरवर्षी नोटिसा केवळ फार्स ठरत असल्याचा अनुभव आहे. (प्रतिनिधी) मोठा पाऊस झाल्यानंतर पावसाचे पाणी कोठेही तुंबू नये यासाठी नगर परिषदेने उपाययोजना केलेल्या आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच मुख्य नाले स्वच्छ करण्यात आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील पेट्रोल पंपच्या मागे असणारा मोठा नाला बांधण्यात आला आहे. त्यामुळे पाणी जाण्यास मोठा मार्ग खुला झाला आहे. बीड शहरात साफसफाईसाठी सध्या न. प. कडे २०० कर्मचारी आहेत. अतिरिक्त ८० कर्मचाऱ्यांचा भरणा करण्यात आला असल्याचे आरोग्य निरीक्षक तिडके यांनी सांगितले.
पावसाळी कामे पूर्ण
By admin | Updated: June 13, 2015 23:45 IST