उस्मानाबाद : जिल्हा शिवसेनेच्या वतीने काढण्यात आलेली ही जनजागरण दिंडी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्यात येतील. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येईल. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न शासनाने तातडीने सोडविण्याची आवश्यकता असून, यासाठी प्रसंगी शासनाविरोधात रस्त्यावर उतरु , असा इशारा शिवसेना संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरुरकर यांनी दिला.जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख सुधिर पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या शेतकरी आत्महत्या बचाव जनजागरण दिंडीचा प्रारंभ शनिवारी परंडा तालुक्यातील सोनारी येथून झाला. याप्रसंगी नेरुरकर बोलत होते. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये या संकटावर मात करण्याची उमेद निर्माण करण्यासाठी ही दिंडी असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, परंड्याचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.ऋण काढून सण करण्याची आपल्याकडे पध्दत होती. पण आता मात्र ऋण काढून मरण ओढावण्याचे काम चालू आहे. निसर्गाच्या कोपामुळे आपण आर्थिक संकटात सापडलो आहोत. हे खरे असले तरी आत्महत्या करणे हा त्यावरील पर्याय नाही. संकटावर मात करुन आपण उभे राहिले पाहिजे असे ते म्हणाले. दिंडीच्या माध्यमातून शिवसैनिक, पदाधिकारी आपल्याकडून सर्व माहिती संकलीत करणार असून त्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कोणत्या उपाय योजना आखता येईल, याबाबत निश्चित धोरण ठरविले जाईल. यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना हा अहवाल देवून त्यांच्या नेतृत्वाखालीलच मुख्यमंत्र्याची भेट घेण्यात येईल. असेही नेरुरकर यांनी सांगितले. शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांनी प्रास्ताविक केले. जिल्ह्यातील अर्धवट प्रकल्प पुर्ण करण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून पाठपुरावा करणार असल्याचे सांगत शेतकरी, शेतमजूर, निराधार आदींच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती दत्ता मोहिते, जिल्हा परिषद सदस्य दत्ता साळुंके, उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, बसवराज वरनाळे, जि. प. चे माजी सभापती धनंजय सावंत, श्रीकांत देशमुख, दिलीप शाळू महाराज, तालुकाप्रमुख दिलीप जावळे, मोहन पनुरे, प्रा. गौतम लटके, बाबुराव शहापुरे, आनंत भक्ते, पापा देशमुख, कमलाकर दाणे, बाळासाहेब देशमुख, मुजीब पठाण, विकास मोळवणे, विजय देशमुख, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू
By admin | Updated: January 18, 2015 00:28 IST