औरंगाबाद : महाविद्यालयांमार्फत विविध शुल्कापोटी सादर केले जाणारे धनाकर्ष (डीडी) न वटवता ते परस्पर गायब करणारी मोठी टोळी विद्यापीठात सक्रिय आहे. आतापर्यंत या टोळीने विद्यापीठाला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा चुना लावल्याचे उघडकीस आले आहे. असे असतानादेखील प्रशासनाने सदरील टोळीचा पर्दाफाश करण्याच्या भानगडीत न पडता महाविद्यालयांमार्फत सादर केले जाणारे विविध शुल्क हे आता ‘आरटीजीएस’ प्रणालीच्या माध्यमातून स्वीकारण्याची प्रक्रिया अमलात आणली आहे. या प्रणालीमुळे विद्यापीठाला गतवर्षीच्या तुलनेत कोट्यवधी रुपयांचा फायदा झाला आहे. यासंदर्भात विद्यापीठ सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, महाविद्यालयांमार्फत संलग्नीकरण शुल्क, शैक्षणिक शुल्क, एनएसएस शुल्क, परीक्षा शुल्क, विद्यार्थी कल्याणाच्या योजनांचे विविध शुल्क आतापर्यंत ‘डीडी’च्या माध्यमातून विद्यापीठास सादर केले जात होते. मात्र, विद्यापीठातील ‘बाबू’मंडळी व काही महाविद्यालयांनी हातमिळवणी करून प्राप्त ‘डीडी’च्या नोंदी रजिस्टरमध्ये केल्या जायच्या; पण सदरील ‘डीडी’ कालमर्यादेत विद्यापीठाच्या खात्यावर जमा न करता तो जाणीवपूर्वक कालबाह्य केले जात असे. त्यानंतर ‘डीडी’ कालबाह्य झाल्याचा निरोप संबंधित महाविद्यालयांना गेल्यानंतर ठरलेला ‘दाम’ घेऊन ते परत केले जात असे. दरवर्षी या माध्यमातून विद्यापीठाला कोट्यवधी रुपयांचा तोटा होत असल्याचे नुकतेच उघडकीसआले. ‘ईएमडी’ मध्येही तत्परता‘अर्नेस्ट मनी डिपॉझिट’ (ईएमडी) अर्थात संबंधित कंत्राटाच्या एकूण रकमेवर १ किंवा २ टक्के भरली जाणारी रक्कम ही परत करण्यामध्येही मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचे उघडकीस आले. ज्या संस्थांचे कंत्राट मंजूर झाले नाही, त्या कंत्राटदारांना ‘ईएमडी’ची रक्कम वर्षानुवर्षे परत केली जात नसे. यापुढे सदरील रक्कम ही निविदाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित कंत्राटदाराच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया विद्यापीठाने अमलात आणली आहे.
विद्यापीठात शुल्क लाटणारी टोळी
By admin | Updated: March 3, 2015 00:29 IST