सदर याचिका मंगळवारी सुनावणीस निघाली असता सीईटी सेलचे वकील मृगेश नरवाडकर यांनी माहिती घेण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली. वैद्यकीय प्रवेशाची अंतिम मुदत १२ नोव्हेंबर असल्यामुळे न्या. एस. पी. देशमुख आणि न्या. एस. डी. कुलकर्णी यांच्या खंडपीठाने बुधवारी सुनावणी ठेवली आहे.
याचिकाकर्ती मेघावी बियाणीचा जन्म भुसावळ येथे झाला. तिचे रहिवासी (डोमिसाईल) प्रमाणपत्र आणि आधार कार्ड भुसावळचे आहे. तिचे वडील शासकीय कंत्राटदार असून, ते महाराष्ट्रलगतच्या दोन-तीन राज्यांमध्ये काम करतात. मेघावीने मध्यप्रदेशमधून एसएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. तिने सप्टेंबर २०२० मध्ये ''नीट'' परीक्षा दिली. त्यात तिला ९७.८८ टक्के गुण मिळाले. तिचा अखिल भारतीय गुणवत्ता क्रमांक २८५५७ आहे. मात्र, तिने महाराष्ट्राबाहेर एसएससी परीक्षा दिली असल्यामुळे तिला प्रवेश नियम ४.५ नुसार प्रवेश घेण्यास अडचण निर्माण झाली.
महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना न्याय मिळावा म्हणून राज्य शासनाने २०१६ आणि २०१९ ला प्रवेश नियमात सुधारणा केली. यातून २०१७ व त्यापूर्वीच्या विद्यार्थ्यांना वगळले होते.
मेघावीतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख काम पाहत आहेत. त्यांना ॲड. देवांग देशमुख, गोविंद कुलकर्णी आणि एन.आर. दायमा सहकार्य करीत आहेत. शासनातर्फे मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे काम पाहत आहेत.