लातूर : देशांतर्गत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी कार्यरत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलातील २७५ जवानांचा ११ वा दीक्षांत समारंभ लातुरातील सीआरपीएफ केंद्रावर रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला़ यावेळी जवानांनी चित्तथरारक कसरतींचे सादरीकरण केले.लातुरातील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २७५ प्रशिक्षणार्थी जवानांचे ४४ आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यामुळे त्यांना रविवारी सकाळी पद व गोपनीयतेची शपथ देऊन देशसेवेसाठी समर्पित करण्यात आले़ ब्रिगेडियर एसक़े़ शर्मा यांनी २७५ जवानांना शपथ दिली. यावेळी खा़डॉ़सुनील गायकवाड, मुख्य कमांडंट रवीगोपाल वर्मा, ब्रिगेडियर एसक़े़शर्मा, परेड कमांडंट व्ही़एस़ससाणे, कमांडंट व्ही़ जया माधवन, उप कमांडंट महेंद्र हेगडे, पवन जोशी, सहाय्यक कमांडंट शिशराम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थिरोग विभाग प्रमुख डॉ़ श्रीकांत गोरे आदींची उपस्थिती होती़ कार्यक्रमाच्या प्रारंभी खा़डॉ़सुनील गायकवाड यांनी जवानांच्या संचलनाची पाहणी केली़ त्यानंतर जवानांच्या विविध पथकाने प्रमुख पाहुण्यांच्या समोर उत्कृष्ट संचलन सादर केले़ त्याचबरोबर जवानांनी मल्लखांब, लेझीम यासह विविध चित्तथरारक कसरती सादर करून उपस्थितांची मने जिंकली़देशाच्या अंतर्गत सुरक्षेत सीआरपीएफचे मोठे योगदान आहे. कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्याचे शिक्षण लातूरच्या या प्रशिक्षण केंद्रातून पूर्ण झाल्यानंतर या केंद्रातील जवान देशसेवेसाठी समर्पित होत आहेत. पुढील काळात या जवानांनी देशसेवेसाठी झोकून द्यावे, असे मत खा.डॉ. सुनील गायकवाड यांनी व्यक्त केले. लातूरच्या या प्रशिक्षण केंद्रातून आतापर्यंत ४४६५ जवानांनी प्रशिक्षण घेतले आहे. हे प्रशिक्षण केंद्र उत्कृष्ट असल्याचे मुख्य कमांडंट रविगोपाल वर्मा म्हणाले.
केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवान देशसेवेसाठी सज्ज
By admin | Updated: April 25, 2016 00:38 IST