वारंगा फाटा : कळमनुरी तालुक्यातील भोसी येथील एका गोठ्यास आग लागून शेतीउपयोगी साहित्य जळून राख झाल्याने जवळपास दीड लाखांचे नुकसान झाल्याची घटना २६ मार्च रोजी सायंकाळी घडली.संतोष रामभाऊ कदम यांचे कुटूंबिय शेतातील कामे आटोपून घरी गेले होते. सायंकाळी साडेसात वाजता त्यांच्या शेतातील गोठ्यास अचानक आग लागली. सदरील घटनेची माहिती मिळताच संतोष कदम यांचे कुटुंबिय, पं.स.सदस्य विजय अवचार, गजानन अवचार व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने रौद्ररुप धारण केल्याने ती आटोक्यात येवू शकली नाही. या आगीत शेतीपयोगी साहित्य, शेणखत, औजारे, गुरांना खावायास ठेवलेले सोयाबीनचे कुटार, विद्युतपंप, वायर, पीव्हीसी पाईप, टीनपत्रे, फवारणीचे पेट्रोलपंप आदींचे मिळून जवळपास दीड लाखावर नुकसान झाले आहे. तसा पंचनामा तोंडापूर येथील तलाठी एन.एल. देशमुख यांनी विजय अवचार, माधव अवचार, मारोती व्यवहारे, योगेश देवकते, टोपाजी कदम या पंचासमक्ष केला आहे. सुदैवाने जिवीतहानी टळली. दरम्यान गोठ्यास आग लागून झालेल्या नुकसानीमुळे संतोष कदम यांच्यावर ऐन दुष्काळात नवे संकट आले आहे. ही आग कशामुळे लागली? याचे कारण समजू शकले नाही. आगीत सर्व शेतीपयोगी साहित्य व गुरांचा अन्न म्हणून वापरण्यात येणारे कुटार जळाल्याने सर्व गोष्टी नव्याने खरेदी करणे म्हणजे दुष्काळात सदरील शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. (वार्ताहर)
गोठ्यास आग; दीड लाखांचे नुकसान
By admin | Updated: March 27, 2016 23:47 IST