कसई दोडामार्ग : निवडणुका जवळ आल्या की, मंडळांना, बचतगटांना साहित्य व खाद्यपदार्थ पुरवून निवडून येणाऱ्या दिवाळी व चतुर्थी अशा सणांवेळीच आठवण काढणाऱ्या नेत्याच्या पाठीशी उभे राहण्यापेक्षा जो पक्ष नागरिकांच्या पाठीशी उभा राहतोय, त्याला साथ दिली पाहिजे, असे प्रतिपादन माजी आमदार व मनसे कोकण विभागीय संघटक परशुराम उपरकर यांनी केले. मनसेच्यावतीने दोडामार्ग तालुक्यात एक रुपयात विमा पॉलिसी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब, तालुकाध्यक्ष शशिकांत आईर, दीपक देसाई, मायकल लोबो, दत्ताराम गावकर आदी उपस्थित होते. उपरकर म्हणाले, मनसेच्यावतीने एक रुपयास विमा पॉलिसी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. एखाद्या वाईट प्रसंगानंतरच या पॉलिसीचे महत्त्व कळणार आहे. राज ठाकरे आंदोलन का करतात, हे जाणून घ्या. उत्तर भारतातील तरुण मुंबईत येतात, त्यामुळे मराठी माणसाला नोकऱ्या मिळत नाहीत. तिलारी धरणाचे पाणी नदीपात्रात, नाल्यामध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता सोडण्यात येते. त्यामुळे आतापर्यंत २३ जणांचे बळी गेले आहेत. यावेळी कोणताही राजकीय पदाधिकारी पुढे आला नाही. तरुण पिढी राजकीय पदाधिकाऱ्यांमुळे वाया जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर पैसे देऊन मते मिळवितात. मात्र, मनसे तुमच्या सुखदु:खात सामील होऊन धीर देणारा पक्ष आहे. असे मत परशुराम उपरकर यांनी व्यक्त केले. (वार्ताहर)
कॅम्पस क्लबचा चॅम्प आजपासून शाळेत
By admin | Updated: July 8, 2014 00:44 IST