सोमनाथ खताळ , बीडजिल्ह्यातील बसस्थानकांमध्ये पाण्याची सुविधाच नाही. पाणपोया फक्त नावालाच उरल्या आहेत. विकतचे पाणी घेऊन पिण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला झळ पोहोचत आहे. ऐन उन्हाळ्यात ही स्थिती असल्याने प्रवाशांत नाराजीचा सूर आहे.सध्या उन्हाळ्याच्या तिव्र झळा जाणवू लागल्या आहेत. या झळांनी अंगाची लाहीलाही होत असून नागरिक घामाघूम होत आहेत. अशा उन्हाच्या लाहित प्रत्येकाला तहान भागविण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. मात्र ही तहान आता विकतच्या पाण्यावर भागविण्याचे वेळ प्रवाशांवर आली आहे. जिल्ह्यातील कुठल्याच बसस्थानकात प्रवाशांसाठी मुबलक आणि शुद्ध पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना परिसरातील हॉटेल किंवा विकतचे पाणी घेऊन पिण्याची वेळ आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पाण्याची सोय नाही. उन्हाळ्याची स्थिती असतानाही महामंडळाला गांभीर्य नसल्याचा आरोप जनाधार प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अनुप मंत्री यांनी केला आहे. या अशुद्ध पाण्यामुळे अथवा पाणी पाणी करून एखाद्या प्रवाशाबाबत काही दुुर्दैवी घटना घडली तर याला सर्वस्वी जबाबदार वरीष्ठ अधिकारीच राहतील. स्थानकातील पाणी प्रश्न मार्गी नाही लावला तर अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशाराही मंत्री यांनी दिला आहे. जिल्ह्यात आठ आगार आणि आठ मोठे बसस्थानके आहेत. तर आठ ते नऊ ठिकाणी मिनी बसस्टँड आहेत. प्रत्येक बसस्थानकात प्रवाशांना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविणे आवश्यक आहे. या सोयी सुविधांसाठी लाखो रूपयांचा निधी येतो. मात्र हा निधी सुविधांसाठी खर्च न करता महामंडळातील अधिकारी संगणमताने वाटून घेत असल्याचा अरोप जनाधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनुप मंत्री यांनी केला आहे.याबाबत विभागीय नियंत्रक पी. बी. नाईक व विभागीय वाहतूक अधिकारी जी. एम. जगतकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते ‘नॉट रिचेबल’ होते.
बसस्थानकांमध्ये ठणठणाट !
By admin | Updated: March 2, 2015 00:54 IST