औरंगाबाद : राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने रेल्वेस्थानकावर रेल्वेगाड्या येण्याच्या वेळेत शहर बससेवा देण्याचे नियोजन करण्यात आले. सुरुवातीचे काही दिवस बससेवा सुरळीत चालली; परंतु गेल्या काही दिवसांत शहर बससेवेला रेल्वे कनेक्टिव्हिटी राहिली नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. दहा मिनिटांनी बससेवा देण्याचे नियोजन केवळ कागदावरच राहिल्याची परिस्थिती दिसून येते.१ आॅगस्टपासून शहागंज- रेल्वेस्थानक शहर बससेवा सुरू झाली. दिवसभरात जवळपास १६८ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले. अडीच वर्षांनंतर शहागंज परिसरातून शहर बससेवा सुरू झाली. या मार्गावर दर दहा मिनिटांनी बस धावतील, असे नियोजन करण्यात आले; परंतु अर्धा-अर्धा तास उलटूनही बस येत नसल्याचा अनुभव प्रवाशांना येत आहे. त्यामुळे नाइलाजाने प्रवाशांना रिक्षांचा आधार घ्यावा लागत आहे. शहर बस वेळेवर येत नसल्याने रेल्वेस्थानक परिसरात रिक्षांची संख्या वाढत आहे. रेल्वे येण्याच्या वेळेवर शहर बसची सेवा सुरळीत ठेवावी, तसेच प्रवाशांना बस नजरेस पडेल, अशी जागा देण्याची मागणी होत आहे.
बससेवेला रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळेना
By admin | Updated: October 7, 2014 00:45 IST