लातूर : जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा १५ जूनपासून सुरू झाल्या असून, जिल्हा परिषदेच्या वतीने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना ३ लाख १७ हजार ७७७ पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल्याने विद्यार्थ्यांच्या आनंदाला भरते आले. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १२८३ शाळा, ४५४ खाजगी शाळा व मनपाच्या २२ अशा १६७६ शाळांमध्ये शिक्षण विभागाच्या नियोजनामुळे पहिल्याच दिवशी ३ लाख १७ हजार ७७७ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळाली. तर १ लाख ९ हजार विद्यार्थ्यांना गणवेशाचेही वाटप करण्यात आले. १५ जून हा शाळेचा पहिलाच दिवस असल्याने आपल्या पाल्यांना शाळेत सोडण्यासाठी पालकांची रेलचेल होती. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने काही पाल्यांच्या चेहऱ्यांवर हसू तर काही जणांच्या डोळ्यांत आसू दिसून आले. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी तालुकानिहाय एका गावाची जबाबदारी स्वीकारल्याने त्या गावातील विद्यार्थ्यांचे स्वागत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी गुलाबपुष्प देऊन केले. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिलाच दिवस असल्याने दररोज खेळणारी बागडणारी मुले नवीन ड्रेस व स्कूल बॅगसह शाळेत फिरताना दिसून आली. एकंदरित, शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या हर्षोल्हासाचा राहिला. शाळेचे नाव काढताच अवघ्या उन्हाळाभर खेळण्या-बागडण्यात व्यस्त असलेल्या काही मुलांनी नन्नाचा पाढा करीत शाळेकडे जाण्यास नकार दिला होता. त्यांच्या पालकांना मात्र मोठी कसरत करावी लागली. मुलांचा स्वभाव जाणून घेत खाऊचे आमिष दाखवीत पालकांनी मुलांना शाळेत आणले. शाळेतील सवंगडी पाहिल्यानंतर रडणाऱ्या चेहऱ्यांवरही हसू फुलले.
रडणाऱ्या चेहऱ्यांवरही फुलले हसू... ३ लाख विद्यार्थ्यांना मिळाली पुस्तके
By admin | Updated: June 16, 2015 00:50 IST