औरंगाबाद : संविधानाच्या १४ व्या कलमाची खूप चर्चा होते; परंतु कलम १३ नुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील जुनाट रूढी- परंपरा व ग्रंथ बेकायदेशीर ठरविल्या आहेत. त्यानुसार मनुस्मृतीसुद्धा बेकायदेशीर असून, ते आता सर्वांनी ठणकावून सांगण्याची गरज आहे, असे स्पष्ट प्रतिपादन आज येथे प्रख्यात समाजवादी नेते, विचारवंत व पत्रकार साथी पन्नालाल सुराणा यांनी केले. ते आंतरजातीय विवाहित १२५ जोडप्यांच्या सत्कारप्रसंगी बोलत होते. तापडिया नाट्यमंदिरात झालेल्या या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मनपा स्थायी समितीचे माजी सभापती रतनकुमार पंडागळे हे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सर्वधर्म समभाव जयंती उत्सव महासंघाच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. मनुस्मृती छापून पुन्हा या ग्रंथाची विक्री सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सुराणा यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रारंभी वसुधा कल्याणकर संचलित शहीद भगतसिंग कला पथकाचा क्रांतिगीतांचा कार्यक्रम झाला. प्रा. प्रताप कोचुरे यांनी गीत गायले. डॉ. बाबासाहेबांचा सहवास लाभलेले शिवराम जाधव, बाबूअण्णा गारोल व बाबासाहेब माने हे या सोहळ्याचे आकर्षण ठरले. या तिघांनीही बाबासाहेबांच्या हृदयस्पर्शी आठवणी सांगितल्या. माजी मंत्री फौजिया खान यांनी देशात आज निर्माण झालेल्या असहिष्णुतेच्या वातावरणाबद्दल चिंता व्यक्त केली व सर्वांनी बाबासाहेबांच्या सुंदर संविधानानुसार वागण्याचे आवाहन केले. कॉ. मनोहर टाकसाळ यांच्या अध्यक्षतेखाली दुपारच्या सत्रात कॉ. बुद्धिनाथ बराळ, तनुजा खोसरे, सुनीला नाडे, डॉ. चंद्रकांत गणवीर, डॉ. अर्चना गणवीर, संगीता खंडाळकर, मनोज देशमुख, सना गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त केले. आंतरजातीय विवाह करताना किती संघर्षाला सामोरे जावे लागते, हे अनेकांनी अधोरेखित केले. जातविरोधी व वर्गविरोधी संघर्ष पूर्वीही होता, आताही आहे व तो सुरूच ठेवावा लागेल, असे कॉ. टाकसाळ म्हणाले. नगरसेविका आशा निकाळजे, महासंघाचे अध्यक्ष मेहबूबभाई, कार्याध्यक्ष डॉ. सतीश सुराणा, उपाध्यक्ष गुड्डू निकाळजे व सरचिटणीस रमेश गायकवाड यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. समता सैनिक दलाचे कमांडर इन चीफ डी. व्ही. खिल्लारे यांचा रतनकुमार पंडागळे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
‘मनुस्मृती बेकायदेशीर हे आता ठणकावून सांगा’
By admin | Updated: May 1, 2016 01:40 IST