लातूर : महानगरपालिकेच्या प्रभाग ११ बच्या पोटनिवडणुकीची रंगत ऐन दुष्काळातही वाढली आहे़ काँग्रेसने माघार घेतली असली तरी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, व राष्ट्रवादी काँग्रेसने जय्यत तयारी सुरू केली आहे़ ११ जणांनी १३ अर्ज दाखल केले होते़ त्यातील सर्वच उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र वैध ठरले आहे़ शुक्रवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने कोण माघार घेणार? याकडे लक्ष लागले आहे़ भाजपा व शिवसेनेने प्रत्येकी दोन उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत़ दोघांपैकी कुणाला पक्षाचा एबी फॉर्म मिळणार, याची प्रभागात चर्चा आहे़ शिवसेनेकडून वैभव बिराजदार, गणेश स्वामी, भारतीय जनता पक्षाकडून देवानंद कलशेट्टी (दोन ), राष्ट्रवादी काँग्रेसकडून समीर शेख, अपक्ष रमेश नेमचंद व्हसाळे (दोन), अजयकुमार व्यंकटराव यादव, गजानन श्रीकांत पसारकर, अयोध्याबाई दिनदयाळ अग्रवाल, पठाण मोहसीन खान, महेश अण्णाराव जाधव यांचा अर्ज वैध ठरला आहे़ दुष्काळात मतदरांची निवडणुकीवर अनास्था असली तरी उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते आतापासून घराघरात चकरा मारत आहेत़ ज्या भागात टँकरचे पाणी मिळत नाही, अशा भागातील नागरिकांना पाण्याची लालसा दाखविण्यात येत आहे़ काही उमेदवारांनी तर मतदारांना आकर्षित करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या मदतीने पाणीवाटपाला सुरूवात केली आहे़
भाजपा-शिवसेना अन् राष्ट्रवादीत लागली चुरस
By admin | Updated: April 1, 2016 01:09 IST