अंबड : तालुक्यातील टंचाई निवारणाच्या कामात हलगर्जीपणा केल्याचे आढळून आल्याने जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या दोन कनिष्ठ अभियंत्यांसह चार ग्रामसेवकांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. यात एका ग्रामसेवकावर तडकाफडकी निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत.मंगळवारी दुपारी येथील गायनाचार्य गोविंदराव जळगावकर नाट्यगृहात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी नायक यांनी अंबड तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती संदर्भात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. मात्र या उपाययोजनांच्या कामात दिरंगाई तर काही ठिकाणी सावळागोंधळ होत असल्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. बैठकीत गटविकास अधिकारी डी.के. पांडव यांच्यासह विविध विभागप्रमूख व ग्रामसेवकांना आपल्या कामाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देता आली नाही. अपुरी व चुकीची माहिती सादर होत असल्याचे चित्र होते. जिल्हाधिकाऱ्यांनी गावनिहाय आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे असलेली आकडेवारी व ग्रामसेवक देत असलेली आकडेवारी यात मोठ्या प्रमाणावर तफावत आढळून येत होती. गावनिहाय आढावा घेत असताना अनेक ठिकाणी निधी उपलब्ध असतानाही केवळ लालफितीमुळे, चिरीमिरीच्या आशेने कामे खोळंबून ठेवल्याचे निदर्शनास आले. एकीकडे दुष्काळाने जनता होरपळत असताना अनेक ग्रामसेवक, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी कामामध्ये चाल-ढकल करत असल्याचे यावेळी समोर आले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पाच ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले. याबरोबरच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या दोन अभियंत्यावर विभागीय चौकशीचे आदेश दिले. यानंतर अनेक प्रश्नासंबधी निरुत्तर असणाऱ्या गटविकास अधिकारी पांडव यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव तत्काळ पाठविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांना दिले. बैठकीस केंद्रे, उपविभागीय अधिकारी डॉ श्रीमंत हारकर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे तांगडे, तहसिलदार महेश सावंत, जि.प.सदस्य सतीश टोपे, गटविकास अधिकारी डी के पांडव, गटशिक्षणाधिकारी मंगल धुपे आदींसह मोठया संख्येने सरपंच, ग्रामसेवकांची उपस्थिती होती. (वार्ताहर)जिल्हाधिकारी रखडलेल्या उपाययोजनांविषयी विचारणा करत असताना ग्रामसेवक, अधिकारी, कर्मचारी यांना समाधानकारक उत्तरे देता येत नाहीत. हे पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी पांडव यांना याविषयी विचारणा केली. वेळोवेळी विचारणा करत असताना गटविकास अधिकाऱ्यांकडेच अपुरी माहिती असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आढळून आले. त्यामुळे याप्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांवर देखील कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र त्यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हस्तपोखरी येथील ग्रामसेवक आर.बी. वाभळे यांच्यावर निलंबन कारवाई, गोंदी येथील ग्रामसेवक बी.बी. टकले, वडीगोद्री येथील ग्रामसेवक एन.ए. फसाटे व चुरमापुरी येथील कंत्राटी ग्रामसेवक साळवे यांची विभागीय चौकशी तर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता स्वामी व महिला अभियंता थिटे यांचीही विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र याबाबतचा अधिकृत दुजोरा मिळाला नाही.जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठकीत सरपंचांशी थेट संवाद साधत काही तक्रार असल्यास मांडण्यांच्या सुचना केली. यावेळी मोठया संख्येने सरपंचांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांविषयी आपल्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या.
सहा जणांवर कारवाईचा दंडुका
By admin | Updated: January 28, 2015 00:55 IST