केंद्रा बु. : सेनगाव तालुक्यातील ताकतोडा व नागटेक या ४ कि. मी. रस्त्यावर नागरिकांच्या व गुरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ताकतोडा येथील शेतकरी उमेश सीताराम सावके यांनी केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पाणपोईने प्रवाशांना तर शेतीच्या पाटात पाणी सोडल्याने जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. परिसरातील नागटेक- ताकतोडा हा रस्ता सेनगाव तालुक्याला जोडण्यासाठी व वाशिम- रिसोड या भागाला जाण्यासाठी वाहनाधारकांना अत्यंत जवळचा मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी वर्दळ पहावयास मिळते. महत्वाचा रस्ता असल्यामुळे प्रवाशांनी हा रस्ता नेहमी गजबजलेला असतो. तसेच परिसरातील गावातून जनावरे या ठिकाणी चारण्यासाठी येत असतात; परंतु या जनावरांना उन्हाळ्यात शेंदुन पाणी पाजवावे लागते. प्रत्येक जनावरांना शेंदुन पाणी पाजणे अवघड आहे; परंतु शेतकरी सावके यांनी नागरिकांसाठी पाण्याची व्यवस्था केली असून जनावरांचीही त्यांनी व्यवस्था केली आहे. कारण उन्हाळ्यात प्रत्येक जनावरांना शेंदुन पाणी पाजविण्यात गुराख्यांची बेजारी होत होती. आता २४ तास जनावरांना येथे पाणी पाजविता येते. दुसरीकडे उन्हाळ्यात पाणी गरम होत असल्याने पाण्याच्या टाकीस पोते गुंडळून ठेवले आहे. त्यामुळे दुपारच्या उन्हात देखील येथे पाणी थंड राहते. मानुसकीच्या उदात्त हेतूतून केलेल्या या व्यवस्थेमुळे वन्य प्राण्यांस देखील पाणी पिण्यास मिळत आहे. रात्रीच्यावेळी पाणी राहत असल्यामुळे येथे वन्यजीव पाणी पिवून जात आहेत. मुक्या जनावरांची व्यवस्था केल्याने सावके यांचे कौतुक परिसरातून होत आहे. उन्हाची तिव्रता लक्षात घेवून पिकांना पाणी देण्याऐवजी सावके यांनी जनावरे व मानसासाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून दिली आहे. (वार्ताहर)
जनावरांसाठी केली पाण्याची व्यवस्था
By admin | Updated: May 22, 2014 00:34 IST