औरंगाबाद : शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी वर्ग जोडण्यात येत असून, त्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांना पाचवीचे ७७७ आणि आठवीचे ३२६ वर्ग सुरू करण्याची परवानगी शिक्षण आयुक्तांनी औरंगाबाद जिल्हा परिषदेला दिल्याचे प्रभारी शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांनी सांगितले. जूनपासून सुरू होणार्या शैक्षणिक वर्षात हे वर्ग सुरू करावेत, अशा सूचना आहेत. देशमुख म्हणाले की, आरटीईनुसार पहिली ते पाचवी इयत्तेतील विद्यार्थ्यांना एक किलोमीटरच्या आत आणि सहावी ते आठव्या इयत्तेतील मुलांना तीन किलोमीटरच्या आत शाळा उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार शिक्षण उपसंचालकांनी केलेल्या पदनिश्चितीमध्ये सुमारे १०० मुख्याध्यापक अतिरिक्त ठरले आहेत. सध्या जिल्हा परिषदेत केंद्रप्रमुखांच्या रिक्त ६९ जागा मुख्याध्यापकांमधून पदोन्नतीने भरल्या जाणार आहेत. त्यानंतर पदवीधर शिक्षकांना पदोन्नती दिली जाईल व नंतरच समायोजन केले जाईल. ही सर्व प्रक्रिया दि.३१ मेपूर्वी पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आंतरजिल्हा बदलीची संमतीपत्रे औरंगाबाद जिल्ह्यातून बाहेरजिल्ह्यात बदली करून जाऊ इच्छिणार्या ३०९ शिक्षकांना एकाच वेळेस संमतीपत्रे देण्यात आली आहेत. सर्व शिक्षकांना संमतीपत्रांचा ई-मेल पाठविण्यात आल्याचे एम.के. देशमुख यांनी सांगितले. आंतरजिल्हा बदलीने औरंगाबादेत ५८६ शिक्षक येण्यास इच्छुक आहेत; परंतु ही प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही, असे स्पष्टीकरणही देशमुख यांनी दिले.
पाचवीच्या ७७७ व आठवीच्या ३२६ वर्गांना मंजुरी
By admin | Updated: May 21, 2014 01:11 IST