लातूर : लातूरचा पाणी प्रश्न किती बिकट आहे, हे मी समजू शकतो. कारण या अवस्थेतून उस्मानाबादकर गेले आहेत. लातूर शहराच्या ३० किमी परिघात १७० कोटी लिटर पाणी उपलब्ध आहे. तेथील स्थानिकांच्या विरोधी मताला सामंजस्याने बदलून तेथील अर्धे पाणी टँकरने शहरवासियांना तातडीने देता येऊ शकते. तर कायमस्वरुपी योजनेसाठी उजनीशिवाय पर्याय नसल्याने पाणीयोजनेच्या मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा लागेल. या दोन्ही मुद्यांवर राज्य शासनाने काही निर्णय नाही घेतले तर आम्ही न्यायालयात अपिल दाखल करणार असल्याची माहिती आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. ते पुढे म्हणाले की, उस्मानाबादला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आठ महिन्यापूर्वी बैठक झाली होती. त्यात उजनी-उस्मानाबादच्या पाईपलाईनवरुन आठ एमएलडी पाणी लातूरसाठी उपसा करायचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. याला मुख्यमंत्री फडणवीस स्वत: अनुकूल होते. आमची क्षमता १६ एमएलडी पाणी उपशाची आहे. परंतु आम्ही आठ एमएलडीच उचलतो. त्यातले सहा एमएलडी पाणी आम्हा उस्मानाबादकरांना पुरते. लातूरने आठ एमएलडी उपसा केला तर आम्ही त्यातले दोन एमएलडी पाणी कळंबसह उस्मानाबाद जिल्ह्यातील गावांना पुरले असते. त्यामुळे आम्हीही या योजनेच्या प्रतिक्षेत होतोे. परंतु काय झाले कळले नाही, ही योजना मागे पडली अन् आमचेही नुकसान झाले. आता पाणीटंचाईत अडकलेल्या लातुरातून मला अनेकांचे दूरध्वनी आले. त्यामुळे मी ती पहायला आलो. टंचाई भीषण आहे. परंतु ही लढाई सर्वांनी लढायला हवी. उस्मानाबादच्या धर्तीवर लातूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी आम्ही विद्यार्थी सहाय्यता निधी उभारणार असल्याची माहिती आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. ते म्हणाले की, उस्मानाबादमध्ये दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या विद्यार्थ्यांसाठी शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त निधी उभारला. विद्यापीठांच्या कुलगुरुंशी आम्ही चर्चा केली. उस्मानाबादला विद्यापीठाचे उपकेंद्र आहे. त्या उपकेंद्राच्या नावाने विद्यापीठाचे एक विशेष खाते उघडण्यात आले. त्या खात्यावर मी पहिल्यांदा माझे एक महिन्याचे मानधन जमा केले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा दोन कोटीचा पगार दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारीही देऊ पहात आहेत. समाजातील दानशूर लोक मदत करीत आहेत. हीच कल्पना आम्ही लातूर जिल्ह्यात राबविणार आहोत. स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर आणि लातूर उपकेंद्राचे संचालक डॉ.डी.एन. मिश्रा यांच्याशी आमचे बोलणे झाले आहे. राष्ट्रीयीकृत बँकेत अकाऊंट उघडण्यात येणार आहे. त्यानंतर उस्मानाबादच्या धर्तीवर अशाच पध्दतीने लातुरातील शासकीय कर्मचारी आणि दानशुर व्यक्तींना आवाहन करण्यात येईल. यातून जमा झालेली रक्कम ही दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी वापरली जाईल. लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या फी माफीसाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हणाले.
लातूरच्या पाण्यासाठी न्यायालयात अपिल करू
By admin | Updated: March 2, 2016 23:19 IST