अंबड : तालुक्यातील वीज ग्राहकांना मागील तीन महिन्यांपासून वीज बिल न मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आहे. याविषयी महावितरणकडे अनेकदा तक्रार करुनही वीज बिल मिळत नसल्याने ग्राहकांना मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.विशेष बाब म्हणजे वीज बिल वाटपाबरोबरच वीज मीटरची रिडींग घेण्याच्या प्रकारातही सावळा गोंधळ होत आहे. अनेकांना अंदाजे रिडींगच्या आधारे अव्वाच्यासव्वा वीजबिल देण्याचा पराक्रम महावितरणने केला आहे. महावितरण कार्यालयात वारंवार तक्रार करुनही महावितरणने संबंधित कंत्राटदारावर कोणतीही कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. उशिरा वीज बिल मिळाल्याने ग्राहकांना नाहक आर्थिक दंड सोसावा लागत आहे. अंबड शहर व परिसरात ४ हजार ४२८ घरगुती, औद्योगिक व वाणिज्य वीज जोडण्या आहेत. मीटरची रिडींग घेण्याचे व बिल वाटप करण्याचे कंत्राट मागील एक वर्षापूर्वी जालना येथील मदर महिला बहुउद्देशीय बचत गट संस्था या खाजगी एजन्सीला देण्यात आले. एजन्सीने मीटर रिडींग घेण्यासाठी व बिल वाटपासाठी काही जणांची नियुक्तीही केली. मात्र यातील बहुतांश व्यक्ती जालना शहर व अन्य गावातील असल्याने त्यांना अंबड शहर व परिसराची माहिती नाही. घरोघरी जाऊन मीटरची रिडींग घेण्याऐवजी अंदाजे रिडींग नोंदवणे, अंदाजे नोंदविण्यात आलेल्या रिडींगच्या आधारे वीजबील देणे, दर महिन्याला बिल वाटप करणे आवश्यक असतानाही दोन-दोन महिन्यांचे वीजबील एकत्र देणे असे प्रकार या एजन्सीने सुरु केले. अंदाजे रिडींग असल्याने वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बील देण्याचा पराक्रम या एजन्सीने वारंवार केला आहे. याविषयी महावितरण कार्यालयात अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. तक्रारदार नागरिक आलेले बिल कमी करण्यासाठी दररोज महावितरण कार्यालयात चकरा मारताना दिसतात. याप्रमाणे गणित मांडल्यास अंबड शहर व परिसरातील वीजग्राहकांना कोणतीही चूक नसताना लाखो रुपयांचा दंड केवळ एजन्सीच्या गलथानपणामुळे भरावा लागणार आहे. मागील तीन महिन्यांपासून वीजबील प्राप्त न झाल्याने ग्राहकांनी याविषयी महावितरण कार्यालयात वारंवार तक्रारीही केल्या, मात्र अद्यापही या खाजगी कंत्राटदारावर कोणतीही कारवाई झालेली नाही. याविषयी महावितरणचे अंबड शहर कनिष्ठ अभियंता सतीश अधाने यांच्याशी संपर्क साधला असता वीजबील न मिळाल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे त्यांनी मान्य केले. संबंधित एजन्सीला वारंवार सूचना देण्यात आल्या. तसेच मागील महिन्यात याविषयी संबंधित एजन्सीला लेखी पत्रही देण्यात आले. तसेच एजन्सीने वीजबिल वाटप न केल्याने महावितरण कर्मचाऱ्यांनी वीजबील वाटपाचा प्रयत्नही केला.सध्या या एजन्सीने गलथानपणाचा कळस गाठला आहे, मागील तीन महिन्यांपासून बहुतांश ग्राहकांना वीजबिलांचे वाटपच करण्यात आलेले नाही. वीजबिल भरण्यास उशिर झाल्यास त्यावर दंड आकारण्यात येतो व जसाजसा उशीर होईल त्यावर चक्रवाढ व्याज दराने वीजबिलाची रक्कम वाढत जाते.
अंबडमध्ये वीजबिल मिळेना!
By admin | Updated: September 4, 2015 00:27 IST