बीड : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली आहेत. काही महिन्यापूर्वीच हे अतिक्रमणे हटविण्यात आले होते मात्र आता जैसे थे स्थिती झाली असून वाहतूक कोंडी व अपघाताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याकडे अतिक्रमण हटाव पथकाचे दुर्लक्ष होत आहे.काही महिन्यांपूर्वी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून सोलापूर- धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणांमुळे महामार्ग अरूंद झाला आहे. तसेच यामुळे अपघातासही निमंत्रण मिळत होते. असे वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत पालिकेने महामार्गांवरील अतिक्रमणावर हातोडा फिरविला होता. त्यानंतर काही दिवस महामार्गाने मोकळा श्वास घेतला. वाहतूक कोंडीही झाली नाही. अपघातालाही आळा बसला होता. मात्र आता पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती झाल्याचे दिसून येत आहे. याकडे मात्र पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून केला जात आहे. यापूर्वी या अतिक्रमणामुळेच अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. शहराला बायपास व उड्डाणपूल नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत आहे. त्यातच अतिक्रमणाने यामध्ये भर टाकली आहे. ही अतिक्रमणे हटवावीत यासाठी अनेक वेळा सामाजिक संघटना, राजकीय पक्षांनी आंदोलने केली, मोर्चे काढले. तात्पुरती अतिक्रमणेही हटविण्यात आली. मात्र पुन्हा जैसे थे परिस्थिती होत असल्याने पालिका, सा.बां. विभाग व पोलीस प्रशासनाचा या अतिक्रमणधारकांवर किती वचक आहे हे स्पष्ट दिसून येत आहे. छोटे- मोठे हातगाडेवाल्यांसह दुकानदारांनी अतिक्रमणे केली आहेत.या अतिक्रमणांमुळे साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, जालनारोड, नगररोड, नगरनाका, बार्शीनाका, बार्शीरोड आदी मुख्य ठिकाणी सर्रास वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनाही कोंडी सोडविताना नाकीनऊ येतात. यातच अपघातही घडत आहेत. यासाठी ही अतिक्रमणे हटवून महामार्ग मोकळा करण्यात यावा, अशी मागणी शहरवासीयांमधून व वाहनधारकांमधून केली जात आहे. (प्रतिनिधी)
पुन्हा अतिक्रमण
By admin | Updated: February 20, 2015 00:09 IST