हिंगोली : जिल्ह्यात तिन्ही विधानसभा मतदारसंघाच्या निवणुकीसाठी प्रशासन सज्ज आहे. ९७२ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून आचारसंहिता पालन, निवडणूक खर्चावर नियंत्रण आदीसाठी पथके स्थापन केल्याची माहिती जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी दिली.कासार म्हणाले, २0 सप्टेंबर रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध होईल. २७ सप्टेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्रे सादर करता येतील. २९ सप्टेंबर रोजी छाननी तर १ आॅक्टोबर ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. १५ आॅक्टोबरला मतदान होईल.या निवडणुकीसाठी वसमत विधानसभा मतदारसंघात ३१४, कळमनुरीत-३३६, हिंगोलीत ३२२ मतदान केंद्रांची स्थापना केली. वसमतमध्ये २ लाख ६२ हजार १७८, कळमनुरीत २लाख ८१ हजार ४00 तर हिंगोलीत २ लाख ८४ हजार ९४६ मतदार आहेत. त्यात नवीन नोंदणीचे काही मतदार वाढतील.प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात प्रत्येकी तीन भरारी पथके, दोन स्थिर पथके, व्हीडीओ चित्रीकरण पथक, चित्रीकरण तपासणी पथक, आदर्श आचारसंहिता पालन पथकाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ९७२ मतदान केंद्रांसाठी तेवढ्याच इव्हीएम मशीन उपलब्ध करून दिल्या जाणार असून राखीवसह ११२५ मशीन उपलब्ध राहतील. विधानसभा लढविणाऱ्या उमेदवारासाठी निवडणूक खर्च मर्यादा २८ लाख रुपये एवढी आहे. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदारांनी निवडणुकीला सामोरे जाण्याचे आवाहन कासार यांनी केले. तसेच काही गैरप्रकार आढळत असल्यास त्याची रितसर तक्रार आचारसंहिता कक्षाकडे दिल्यावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे. तर स्वीप-२ या कार्यक्रमात मतदार नोंदणीची संधी १७ सप्टेंबरपर्यंत आहे. तहसील कार्यालयातील मदत केंद्रात जावून त्याचा लाभ घेता येईल. तसेच यादीत नाव असल्याची खात्री करून घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही.बनसोडे, अ. जिल्हाधिकारी राम गगरानी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, निवडणूक उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, उपविभागीय अधिकारी के.ए.तडवी, जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार विद्याचरण कडवकर, श्रीनिवास मेंडके, श्याम मदनूरकर, नर्सीकर आदींची उपस्थिती होती.
निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण
By admin | Updated: September 13, 2014 23:04 IST