बापू सोळुंके ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वारंवार कारवाई करूनही सिग्नल तोडणे, दारू पिऊन गाडी चालविण्यासारखे वाहतूक नियमांची ऐसीतैशी करणा-या अकराशे वाहनचालकांचे लायसन्स लवकरच रद्द होणार आहे. याबाबत शिफारस शहर वाहतूक विभागाच्या सहायक पोलीस आयुक्तांनी आरटीओकडे केली आहे. यापैकी ४५ जणांचे लायसन्स निलंबित करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. बेशिस्त वाहनचालकांमुळे शहरात रोज लहान-मोठे अपघात होतात. एवढेच नव्हे, तर जालना रोडसारख्या महत्त्वाच्या मार्गांवर आणि चौकात वाहतूक कोंडी होत असते. सिग्नल तोडून वाहन पळविणे, अवैध प्रवासी वाहतूक करणे, चौकात रिक्षा उभ्या करणे, विना हेल्मेट दुचाकीस्वार, विना सीटबेल्ट कार चालविणे, राँग साइड वाहने पळविणाºयांविरुद्ध वाहतूक शाखेच्या वतीने रोज कारवाई केली जाते.या कारवाईचा कोणताही परिणाम वाहनचालकांवर होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी वारंवार नियम मोडणा-या वाहनचालकांचे लायसन्स रद्द करण्याची शिफारस आरटीओकडे करण्याचे आदेश सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) सी.डी. शेवगण यांना दिले.आदेश मिळताच एसीपी शेवगण यांनी शहर, सिडको, छावणी आणि वाळूज वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या १५ पोलीस अधिकारी आणि ३०० पोलिसांना कारवाईचे आदेश दिले.वारंवार सिग्नल तोडून पळणा-या दुचाकीचालकांना पकडल्यानंतर त्यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईचा डेटा त्यांनी तयार केला.या डेटानुसार एखाद्या वाहनचालकास वाहतूक नियम मोडताना किती वेळा पकडण्यात आले, याबाबतची सर्व माहिती अधिका-यांना प्राप्त झाली. पंधरा दिवसांमध्ये तीनपेक्षा अधिक वेळा वाहतूक नियम मोडून वाहन चालविणा-या अकराशे वाहनचालकांचे लायसन्स रद्द करण्याची शिफारस आरटीओकडे नुकतीच करण्यात आली.या शिफारसीची अमंलबजावणीही आरटीओ कार्यालयाकडून करण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती एसीपी शेवगण यांनी दिली. ते म्हणाले की, चौकात थांबणा-या रिक्षाचालकांवर माझ्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी सतत कारवाई करतात. यासोबतच वाहतूक नियम मोडणा-या अन्य वाहनचालकांविरुद्ध आम्ही दंडात्मक कारवाई करीतच असतो.
११०० बेशिस्त चालकावर गंडातर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 23:53 IST