बीड : पालिकेकडून सध्या वसुली मोहीम जोरात सुरू असून मागील आठ दिवसांपासून थकबाकी असणाऱ्या लोकांना जप्तीच्या नोटिसा पाठविल्या जात आहेत. मंगळवारपर्यंत ही संख्या ४७१ पर्यंत पोहोचली आहे.सध्या आर्थिक वर्ष संपण्यासाठी फक्त एकच महिना बाकी आहे. यातच पालिकेची थकबाकी ही जवळपास १८ लाखांच्या आसपास असून यापैकी पाच कोटींच्या आसपास वसुली करण्यात वसुली विभागाला यश आले आहे. सध्या पालिकेच्या वतीने २७ लोक वसुली कामासाठी कार्यरत आहेत. तसेच ही वसुली करण्यासाठी आता मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी कडक पाऊल उचलले आहे. शहरातील ४७१ थकबाकीदारांना जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या असल्याचे वसुली अधिकारी एन.डी.खोमणे यांनी सांगितले. तर अनेक ठिकाणी पाणी पुरवठा विभागाला घेऊन नळ कनेक्शनही तोडण्यात आले.(प्रतिनिधी)पालिकेकडून करण्यात येत असलेल्या वसुलीचा टक्का सध्या वाढत आहे. सध्या वसुलीची टक्केवारी २९ टक्के असून डिसेंबर अखेरला हीच टक्केवारी १८ च्या आसपास होती. ज्या लोकांना जप्तीच्या नोटिसा पाठविल्या आहेत, त्यापैकी काही लोकांनी थकबाकी भरल्याचेही खोमणे यांनी सांगितले. नोटिसा बजावलेल्या थकबाकीदारांविरोधात पुढच्या आठवड्यात कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी सांगितले.
४७१ थकबाकीदारांना जप्तीच्या नोटीस
By admin | Updated: March 4, 2015 00:24 IST