जालना- शहरातील औरंगाबाद मार्गावरील चंदनझिरा जवळ असलेल्या मारोती आॅटो मोटीव्ह शोरूमला लागलेल्या आगीत सुमारे ४२ लाखाचे नुकसान झाले. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. आग शॉटसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नगर पालिका कर्मचारी चंद्रकात जैन हे औरंगाबादकडे जात असताना पहाटे ५ वाजेच्या सुमारास त्यांना औरंगाबाद रोडवरील मारोती शोरूममधून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे तसेच त्याचे शटर लाल झाल्याचे दिसले. ते पाहताच जैन यांनी ही माहिती अग्निशामक दलाच्या कर्मचार्यांना दिली. त्यानुसार माहिती मिळताच रविवारी पहाटे अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. शटर लालबुंद झाल्याने खिडकीतून त्यांनी पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. नंतर कंपनीचे मॅनेजर व अधिकारी आल्यानंतर पाठीमागील दरवाजा उघडून आग आटोक्यात आणली. दरम्यान, ही आग मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास लागली असल्याचा अंदाज अग्निशामक दलाच्या जवानांनी व्यक्त केला. तसेच एवढी मोठी आग लागलेली असतानाही व शोरूमवर खाजगी सुरक्षा रक्षक तैनात असतानाही अग्निशामक दलास लवकर पाचरण केले नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. रस्त्याने जाणारे पालिका कर्मचारी जैन यांनीच याबाबत माहिती दिली. ही माहिती वेळीच मिळाली नसती तर आग वरच्या मजल्यावर जाऊन मोठे नुकसान झाले असते. दरम्यान, या आगीत ३२ लाखांच्या पाच नवीन कार व शोरूम मधील कपाट, सोफासेट, फर्निचर आदी जळून १० लाखांचे असे एकूण ४२ लाखांचे नुकसान झाले असल्याचे मॅनेजर उपेद्र जपे यांनी सांगितले. ही आग आटोक्यात आण्यासाठी गणपत काटकर, राजन पाडपल्ली, आर. बी. सोनार, विश्वनाथ बनसोडे, सुरेंद्र ठाकूर, संदीप ससाने, चंद्रकात लोखंडे यांनी प्रयत्न केले. याप्रकरणी तालुका जालना पोलिस ठाण्यात घटनेची नोंद असल्याचे सूत्रांनी सांगितले. नव्या कोर्या ५ कार भस्म : जालना शहरात रविवारी एका शोरूमला लागलेल्या आगीत नव्या कोर्या ५ कार भस्म झाल्या. शो रुमच्या कार्यालयातील इतर सामानही जळून खाक झाले.
आगीत ४२ लाखांचे नुकसान
By admin | Updated: May 12, 2014 00:06 IST