सुखापुरी : अंबड तालुक्याती सुखापुरी येथील तलावातून पंचनाम्यानंतरही कृषीपंपाद्वारे अवैध पाणी उपसा सुरुच असून भविष्यात पाऊस न झाल्याचे पाण्याचे गंभीर संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.सुखापुरीसह लखमापुरीच्या ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी तहसीलदारांकडे तलावातून अवैधरित्या शेतीसाठी पाणी उपसा केल्या जात असल्याची तक्रार तहसीलदारांकडे केली होती. तेव्हा तहसीलदारांच्या सूचनेवरुन मंडळ अधिकारी ए. एस. लोखंडे यांच्या नेतृत्वाखालील ए. बी. शिंदे, सुरेंद्र पोतदार, विजया राजपूत, पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष इलियास बागवान, संतोष वखरे यांनी १ आॅगस्ट रोजी तलावातील तीनही बाजूस म्हणजे कुक्कडगाव शिवारात १० विद्युत पंप, लखमापुरी शिवारात १६ विद्युत पंप व कुक्कडगाव कौडगाव पश्चिस बाजूस १५ विद्युत पंपाचा रात्री ८ वाजेपर्यंत पंचनामा केला होता. मात्र आठवड्यानंतरही या अवैध पाणीउपसाधारकांवर कार्यवाही झालेली नाही. परिसरात केवळ सुखापुरी तलावातच २५ टक्के पाणीसाठा असल्याने भविष्यात ते पाणी टॅँकरद्वारे पिण्यासाठी पुरविण्याचे नियोजन होऊ शकते. तसेच जनावरांचाही प्रश्न सोडविल्या जाऊ शकतो. तलावातील पाणी उपशामुळे विहिरी व कुपनलिकांची पाणीपातळी कमालीची घटत चालली आहे. पाणी उपसा असाच सुरु राहिल्यास आणि पाऊस न पडल्यास पिण्याच्या पाण्याची जटील समस्या निर्माण होणार असून त्यादृष्टीने उपाययोजना म्हणून तलावातील पाणी उपसा थांबविण्यात यावा, अशी मागणी महेंद्र गायकवाड, सखाराम सातभद्रे, सुनिल राखुंडे, सुनील गाडे, बाळू अवधूत आदींनी केली आहे. मंडळ अधिकारी ए. एस. लोखंडे यांना पाणी उपशासंदर्भात विचारणा केली असता, ते म्हणाले की, १ आॅगस्ट रोजी विद्युत पंपाचा पंचानामा करुन तहसीलदारांना अहवाल सादर करण्यात आलेला आहे. तसेच महावितरण व इरिगेशन विभागाला कळविण्यात आले आहे. (वार्ताहर)
४१ कृषीपंपाद्वारे होतोय धरणातून पाणी उपसा
By admin | Updated: August 11, 2014 00:03 IST