लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यात ४ लाख २६ हजार कुटुंबे सध्या उघड्यावर शौचाला जात असल्याचा आकडा स्वच्छ भारत मिशन बेसलाइनच्या पाहणीनुसार पुढे आला आहे. मार्च २०१८ अखेरपर्यंत पूर्ण विभागात स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय बांधणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे प्रशासकीय यंत्रणेसमोर आव्हान आहे.हगणदारीमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी सर्वांचा पुढाकार गरजेचा आहे. मराठवाड्यात हगणदारीमुक्तीचे काम प्रगतिपथावर असून, जालना जिल्हा आघाडीवर असल्याचा दावा करण्यात येत आहे. राज्यातील २९ हजार गावे हगणदारीमुक्त झाली आहेत. अनेक ठिकाणी शौचालयाचे बांधकाम झाले आहे. या शौचालयांचा वापर करण्याबाबत नागरिकांची मानसिकता अद्याप तयार झालेली नाही. त्या शौचालयांचा वापर करण्यासाठी प्रचार आणि प्रसार करण्याचा विचार सुरू आहे. मराठवाड्यासह महाराष्ट्र मार्च २०१८ पर्यंत हगणदारीमुक्त करण्याचे लक्ष्य आहे.शौचालय बांधण्यासाठी महाराष्ट्रात २७७ कोटींचे अनुदान तत्काळ उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यापैकी १२० कोटी मराठवाड्यात देण्याचा दावा करण्यात येत आहे. मराठवाड्यातील ज्या जिल्ह्यात कामांना गती नाही, अशा जिल्ह्यातील कामांचा आढावा घेण्यात येत असला तरी आगामी चार महिन्यांत लक्ष्यपूर्तीचे मोठे आव्हान प्रशासकीय यंत्रणेसमोर आहे.
विभागात ४ लाख २६ हजार कुटुंबे शौचालयाविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:40 AM