पानगाव : येथील व्यंकटेश कॉटन उद्योगातील रूईला गुरुवारी सकाळी ८़३० च्या सुमारास अचानक आग लागल्याने ३२ लाखांचे नुकसान झाले आहे़ अग्निशमन दल व कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही आग आटोक्यात आणणे शक्य झाले़ रेणापूर तालुक्यातील पानगाव या गावालगत व्यंकटेश कॉटन उद्योग आहे़ गुरूवारी सकाळपासूनच जिनिंगमध्ये कापूस जीन करण्याचे काम सुरू झाले होते़ जिनिंगमधील कापसाच्या पाला गोडाऊनमधील रूईला सकाळी ८़३० च्या सुमारास अचानक आग लागली़ पाला हाऊसमध्ये ठेवलेल्या रूईच्या १०० गोणीसह १५० क्विंटल रूई आगीत भस्मसात झाल्या. दरम्यान, अचानक उष्णता वाढल्याने आणि धुराचे लोळ पसरू लागल्याने उद्योगातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली तेव्हा आग लागल्याचे निदर्शनास आले़ त्यामुळे कर्मचाऱ्यांनी धावपळ करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला़ दरम्यान, लातुरातील अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले़ हे अग्निशमन दल वेळेवर पोहोचल्याने आग आटोक्यात आणणे शक्य झाले़ या आगीत जवळपास ३२ लाखांचे नुकसान झाले आहे़ आग आटोक्यात आणताना काही कर्मचाऱ्यांच्या हाताला इजाही झाली आहे़ त्यांच्यावर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात येत आहेत़ आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र कळू शकले नसल्याचे उद्योगाचे मालक व्यंकटेश चव्हाण यांनी सांगितले़ (वार्ताहर)पानगाव येथील कॉटन उद्योगातील रूईला आग लागल्यामुळे ३२ लाखांचे नुकसान झाले. व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखविल्यामुळे तात्काळ आग आटोक्यात आली. तरीही ३२ लाखांचे नुकसान झाले. अग्निशमन दल व कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या परिश्रमाने आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून, आग आटोक्यात आणताना काही कर्मचाऱ्यांना इजाही झाली आहे.
आगीत ३२ लाखांचे नुकसान
By admin | Updated: March 27, 2015 00:30 IST