औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील २७ पैकी २५ उमेदवारांची अनामत (डिपॉझिट) जप्त झाली आहे. यामध्ये आम आदमी पक्षाचे सुभाष लोमटे, बसपाचे इंद्रकुमार जेवरीकर आणि समाजवादी पार्टीचे अॅड. सदाशिव गायके यांचाही समावेश आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात २७ उमेदवारांनी मतदारांचा कौल मागितला होता. मुख्य आणि थेट लढत मात्र, शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि काँग्रेसचे नितीन पाटील यांच्यातच झाली. मतदारसंघात ९ लाख ८२ हजार मतदारांनी मतदान (६२ टक्के) केले. उमेदवाराने वैध मतांच्या १२.५ टक्क्यांपेक्षा कमी मते घेतल्यास त्याची अनामत रक्कम जप्त होते. त्यानुसार औरंगाबाद मतदारसंघात अनामत रक्कम वाचविण्यासाठी मतांचा हा कोटा १ लाख १० हजार इतका ठरला. चंद्रकांत खैरे आणि नितीन पाटील हेच केवळ लाखाच्या वर मते घेऊ शकले. त्यामुळे इतर २५ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. निवडणुकीच्या रिंगणात समाजवादी पार्टी, बसपा, बहुजन मुक्ती पार्टी, आम आदमी पार्टी, आंबेडकर नॅशनल काँग्रेस, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी, गरीब आदमी पार्टी, वेल्फेअर पार्टी यांच्या उमेदवारांबरोबरच १७ अपक्ष उमेदवारांनीही मतदारांचा कौल मागितला होता. आम आदमी पक्षाचे उमेदवार सुभाष लोमटे यांना ११,९६५ तर बसपाचे उमेदवार जेवरीकर यांना ३७,३८७ मते मिळाली. उर्वरित उमेदवारांना १० हजारांचाही पल्ला गाठता आला नाही. लोकसभा निवडणुकीसाठी आयोगाने यावेळी खुल्या प्रवर्गातील उमेदवार असेल तर २५ हजार रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवार असेल तर साडेबारा हजार रुपये एवढी अनामत रक्कम ठेवली होती. २००९ मध्ये १९ जण २००९ च्या लोकसभा निवडणुकीत २२ पैकी १९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. तेव्हा एकूण ७ लाख १२ हजार मतदान झाले होते. डिपॉझिट वाचविण्यासाठी किमान ९० हजार मते मिळविणे आवश्यक होते. शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे उत्तमसिंह पवार आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरीजी मौनगिरीजी महाराज वगळता इतरांना तेवढी मते मिळविता आली नव्हती. खैरे यांना २ लाख ५५ हजार, पवार यांना २ लाख २२ हजार आणि शांतीगिरीजी महाराजांना १ लाख ४८ हजार मते मिळाली होती.
औरंगाबादेत २५ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
By admin | Updated: May 17, 2014 01:15 IST