औरंगाबाद : वस्तीशाळांवर अतिरिक्त ठरलेल्या १०६ निमशिक्षकांना जिल्हा परिषदेने नोकरीत सामावून घेतलेले नाही. त्यामुळे हे सर्व निमशिक्षक सैरभैर झाले असून ते आठवडाभरापासून जिल्हा परिषदेत येऊन ठाण मांडत आहेत. वस्तीशाळांवरील निमशिक्षकांना कायम सेवेत सामावून घेण्याचा आदेश न्यायालयाने दिल्यानंतरही राज्यभरातील निमशिक्षकांना सेवेत सामावून घेण्यात आले. औरंगाबाद जिल्हा परिषदेनेही गेल्या आठवड्यात ५७२ निमशिक्षकांना सेवेत कायम केले; परंतु १०६ निमशिक्षक अद्यापही कायम होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्हा परिषदेत ६७८ निमशिक्षक कार्यरत होते; परंतु बांधकाम न झाल्याने व विद्यार्थी संख्या घटल्याने काही शाळा बंद पडल्या व तेथील शिक्षक अतिरक्त झाले. या अतिरिक्त निमशिक्षकांना इतर शाळेवर पर्यायी म्हणून घेण्यात आले होते. परंतु या पर्यायी शिक्षकांना प्रशासनाने कायम केले नाही. औरंगाबाद वगळता इतर सर्व जिल्ह्यांत पर्यायी शिक्षकांना सेवेत कायम करण्यात अल्याचे या शिक्षकांनी सांगितले. जि.प. सदस्य ज्ञानेश्वर मोटे यांनी या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांची भेट घेतली व या निमशिक्षकांना सेवेत कायम करण्याची मागणी केली. नियमात बसणाऱ्या शिक्षकांना येत्या आठवडाभरात सेवेत कायम केले जाईल, असे चौधरी यांनी सांगितले.
१०६ निमशिक्षक नोकरीपासून वंचित
By admin | Updated: July 22, 2014 00:37 IST