धनराज रामटेके लोकमत न्यूज नेटवर्क मूल : तालुक्यातील आकापूर मरेगाव स्थित एमआयडीसी आहे. मात्र मागील ३० वर्षांचा कालावधी लोटूनही अपेक्षित उद्योग स्थापन न झाल्याने आजही तालुक्यातील युवकांच्या हाताला काम नसल्याने तालुक्यात बेरोजगार युवकांची फौज निर्माण झाली आहे. उद्योगाअभावी युवक बेरोजगारीच्या खाईत जात असून, रोजगारासाठी युवकांचे बाहेर राज्यात स्थलांतर होत आहे.
मूल तालुक्यात जोमाने विकास होत असतानाच अपुऱ्या सिंचन सोयी सुविधांचा अभाव असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकरी अस्मानी सुलतानी संकटाला सामोरे जातानाच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती बिनभरोशाची झाली आहे. त्यामुळे युवकांचा ओढा औद्योगिक शिक्षणाकडे वळला. तालुक्यात एमआयडीसी असल्याने मोठमोठे उद्योग धंदे स्थापन होतील व आपल्या हाताला काम मिळेल या आशेने अनेक युवकांनी तांत्रिक शिक्षण घेतले. मात्र ३० वर्षांचा कालावधी लोटूनही आकापूर मरेगाव स्थित एमआयडीसी परिसरात अपेक्षित उद्योग स्थापन न झाल्याने सुशिक्षित युवकांची उपेक्षा झाली असून, रोजगाराभावी युवक नैराश्यात सापडला आहे.
रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी आकापूर मरेगाव स्थित औद्योगिक महामंडळातील भूखंडाचे वाटप करण्यात आले. मात्र अनेक वर्षे लोटूनही उद्योजकांनी उद्योगधंदे उभारले नाही. आजच्या स्थितीत केवळ दोन तीन उद्योग सुरू आहेत. इतर उद्योग सुरू व्हावेत यासाठी लोकप्रतिनिधींनी कधीही प्रयत्न केल्याचे दिसत नाही. त्यामुळे हजारो सुशिक्षित युवकांचा हाताला काम नाही.
बेरोजगार तरुण वळताहेत वाममार्गाकडे शिक्षणाच्या बाजारीकरणात गुरफटल्या गेलेल्या सुशिक्षित ग्रामीण बेरोजगार युवकांचा प्रश्न ऐरणीवर असून हजारो युवक नैराशेत गेले असून, असून झटपट पैसा कमविण्याच्या नादात वाममार्गाला लागले असल्याचे भयावह चित्र तालुक्यात निर्माण होत आहे. त्यामुळे तालुक्यात गुन्हेगारीचा आलेख वाढताना दिसत आहे.
"मूल तालुक्यात एमआयडीसी आहे. मात्र या ठिकाणी मोठे उद्योग स्थापन न झाल्याने येथील स्थानिक बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावे." - कृष्णा कुळमेथे, बेरोजगार युवक