चंद्रपूर : शासनाच्या विशेष घटक उपयोजेनंतर्गत अनुसूचित जमाती, कोलाम व समाजातील इतर दुर्बल घटकातील शेतकऱ्यांना सन २०१३ ते २०१५ या वर्षात बैलजोड्या, बैलगाडी व सिंचनासाठी विहीर, तुषार सिंचन संचाचे वाटप मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. मात्र सदर योजनेचा लाभ लाभार्थ्यांना तात्पुरताच मिळाला असून बैलजोड्या व सिंचनाचे संच सावकरांकडे असल्याची माहिती आहे.आदिवासी कोलाम शेतकऱ्यांना अधिक उत्पादन घेता यावे म्हणून या योजनेमध्ये शेकडो लाभार्थ्यांची निवड करुन बैलबंडी, बैलजोड्या वाटपाचा कार्यक्रम गाजावाजा करीत राबविला. मात्र अल्पावधित सदर बैलगाड्या निकृष्ट दर्जाचे असल्याची ओरड सर्वत्र झाली. सध्या बैलबंड्या दुरुस्तीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. कोरपना तालुक्यात तांगारा, निजामगोंदी, कमलापूर, थिप्पा, बेलगाव आदी गुड्यांवर कोलाम शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. तसेच लोणी, हिरापूर, सोनुर्ली, गडचांदूर, अंतरगाव, परसोडा आदी अनेक गावात बैलजोड्यांचे वाटप करण्यात आले. मात्र सावकारी कर्ज असल्याने त्यातील अनेक बैलजोड्या सावकारांच्या घशात गेल्याचे समजते. याचबरोबर शेतात उत्पादनात वाढ व्हावी म्हणून सिंचन विहिरीसाठी एक लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले. यातही काही लाभार्थ्यांकडे विद्युत मीटर, आॅईल इंजिन नसल्याने याचा उपयोग त्यांनाच घेता आलेला नाही. तर दुसरीकडे काही विहिरींचे काम अर्धवट असल्याची ओरड शेतकरी करताना दिसत आहे. (शहर प्रतिनिधी)
लाभार्थीच लाभाविना !
By admin | Updated: November 6, 2015 02:09 IST