मंगेश भांडेकर ल्ल चंद्रपूरवरुणराजाच्या अवकृपेमुळे अनेकवेळा शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाचे अस्मानी संकट झेलावे लागते. मान्सून कालावधीत कमी पर्जन्यमान झाले तर भूजल पातळीत घट येऊन शेतपिकांना पाणी देणे अवघड जाते. मात्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानामुळे ही अडचण आता काही प्रमाणात दूर झाली आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून अनेक गावात पाण्याचे स्त्रोत वाढले असून आतापर्यंत जिल्ह्यात ४ हजार २१८ कामे करण्यात आली आहेत. या कामांवर ३६ कोटी ६२ लाख रूपये खर्च झाले आहे.पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाने राज्यभरात जलयुक्त शिवार अभियान १ जानेवारीपासून सुरु केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावांना पाणी टंचाईमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला. प्रत्येक जिल्ह्याला निधी उपलब्ध करून देऊन उपलब्ध जलस्त्रोताच्या बळकटीकरणावर भर देण्यात आला. त्यामुळे अनेक गावांना याचा फायदा झाला आहे. जिल्हाभरात विविध विभागाच्या निधीतून ४ हजार २१८ कामे करण्यात आली असून यासाठी ८६ कोटी २७ लाख ३० हजार रूपयाचा निधी उपलब्ध झाला. यात प्रत्यक्षात ३६ कोटी ६२ लाख ५० हजार रूपये खर्च झाले आहेत. अभियानाच्या माध्यमातून झालेली कामेअभियानाच्या माध्यमातून कृषी, लघुसिंचन, जलसंपदा व जिल्हा परिषदेच्या वतीने गाव तलाव दुरुस्ती, नाला खोलीकरण, नाला रुंदीकरण, सिमेंट क्रॉक्रीट बंधारे बांधकाम, जुन्या जलसंरचनाचे पुनर्जीवन, जोड प्रकल्प राबविणे, कालवा दुरुस्ती, वृक्ष लागवड, तलावातील गाळ काढणे, मोठ्या व मध्यम प्रकल्पाची उपयोगीता वाढविणे आदी कामे करण्यात आली. ही कामे जिल्हास्तरावर उपलब्ध होणाऱ्या निधीतून झाली आणि कामांचे मूल्यमापनही करण्यात आले. असा आहे अभियानाचा उद्देशलोकसहभागातून जलस्त्रोतांचा साठा वाढविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. पावसाचे पाणी शिवारात अडविणे, भुर्गभातील पाणी पातळी वाढविणे, सिंचन क्षेत्र वाढवून शेतीला पाणी देणे, पाणी वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, विकेंद्रीत पाणी साठे निर्माण करणे, नविन कामे हाती घेणे, अस्तीत्वात असलेल्या व निकामी झालेल्या जलस्त्रोतांची पाणी साठवण क्षमता पुर्नस्थापीत करणे आदी कामे या अभियानाच्या माध्यमातून करण्यात आली.शेतकऱ्यांना झाला लाभयावर्षी जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला. पेरणी केल्यानंतर पावसाने दगा दिल्याने अनेक ठिकाणी पिके करपण्याच्या मार्गावर होती. मात्र जलयुक्त शिवारच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या तलाव, बोड्यामध्ये पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे सोयीचे ठरले.जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जमिनीत पाणी मुरविणे व पाणी पातळी वाढविणे हा मुख्य उद्देश आहे. यावर्षी या अभियानाच्या माध्यमातून अनेक कामे पूर्ण झाली असून अत्यल्प पावसात या अभियानाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या तलाव, बोड्यांचे पाणी शेतकऱ्यांना कामी आले. पहिल्या वर्षी या अभियानासाठी २१८ गावांची निवड करण्यात आली असून पाच वर्षात या अभियानाची कामे करायची आहेत. त्यामुळे उपलब्ध जलसाठ्याचा लाभ शेतकरी व नागरिकांना होईल.- डॉ. दीपक म्हैसेकर जिल्हाधिकारी, चंद्रपूर.
जलयुक्त शिवारने ‘जलसंजीवनी’
By admin | Updated: September 30, 2015 01:24 IST