पोंभुर्णा : तालुक्यातील देवाडा खुर्द येथे गेल्या सात दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असल्याने स्थानिक नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या ढसाळ नियोजनामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.देवाडा खुर्द येथे ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत ग्रामस्थांना नळाद्वारे पाणी दिले जाते. परंतु सदर योजनेच्या यंत्रामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे कारण पुढे करून तब्बल सात दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असल्याने स्थानिक महिलांना प्रचंड अडचण निर्माण होत आहे. यावर्षी उशिरा पाऊस पडल्याने गावामध्ये धान शेतीच्या रोवणीला जोमात सुरुवात झाली आहे. त्यातच स्थानिक महिला सकाळपासून आपल्या शेतामध्ये शेतीचे कामे करण्यासाठी जातात. सायंकाळी घरी आल्यानंतर त्यांना पाणीविषयक समस्या सोडविण्यासाठी विहिरी व बोअरिंंगवर जावे लागते. त्यात गर्दी होत असल्याने तासन्तास उभे राहून आपला वेळ खर्ची करावा लागत आहे. तसेच सकाळी सुद्धा पाण्यासाठी वेळ वाया घालवावा लागत आहे. एकंदरीत यामुळे शेती व्यवसायावर विपरित परिणाम होत आहे. या ठिकाणच्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईन व मशिनमध्ये बिघाड होणे ही नित्याचीच बाब आहे. याच ठिकाणी मागील सात वर्षांपासून भारत निर्माण योजनेंतर्गत दुसरी योजनासुद्धा मंजूर आहे. ती सुद्धा सात वर्षांचा काळ लोटूनसुद्धा पूर्णत्वास आली नाही. त्यावर आणि त्यावर आतापर्यंत ५२ लाख रुपये खर्च झाले आहेत. पाण्याच्या दोन टाक्या आहेत. मात्र पाणी पुरवठा योजना तहाणलेलीच आहे.(तालुका प्रतिनिधी)
देवाडा खुर्द येथे सात दिवसांपासून पाणीपुरवठा बंद
By admin | Updated: August 19, 2015 01:23 IST